तो रस्ता मुंबई-गोवा महामार्गसारखा ऐतिहासिक आहे का?

तो रस्ता मुंबई-गोवा महामार्गसारखा ऐतिहासिक आहे का?

Published on

मुंबई-गोवा महामार्गासारखा ‘ऐतिहासिक’ रस्ता?
ठाणे-भिवंडी रस्त्याच्या कामावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः ठाणे ते भिवंडी-वडपे रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तो काय मुंबई-गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का?’ असा संतप्त सवाल विचारत त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अनेकदा अपघात होऊन यामध्ये लोकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २६) पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री, खासदार आणि आमदारांनीही या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली.
शिंदे यांनी या वेळी, ‘काम होत नसेल तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करा. काम करत नसाल, तर तुम्हालाही निलंबित करीन,’ असा इशारा दिला. त्यांनी तत्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही दिले.

प्रशासनिक कारभारावर नाराजी
खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचे काम जुन्या तंत्रज्ञानाने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीवर बोट ठेवले. ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनीही एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी आणि एमएमआरडीए विभागांना या कोंडीसाठी जबाबदार धरले.


नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी
ठाणे, ता. २६ ः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून, त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून मदत पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
शिंदे यांनी स्पष्ट केले, की शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी मदत कार्याला प्राधान्य द्यावे. बैठकीत वीज पडून जनावरांचा मृत्यू, घरांची पडझड, तसेच इतर नुकसानीची माहिती देण्यात आली, त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, पुढील बैठकीत सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com