पावसामुळे जनजीवन विस्कळीत
पावसामुळे जनजीवन विस्कळित
टिटवाळ्यासह ग्रामीण भागात जलमय स्थिती
टिटवाळा, ता. २८ (वार्ताहर) : शनिवारी (ता. २७) सुरू झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात हाहाकार माजवला आहे. नद्यानाले दुथडी भरून वाहू लागले असून, अनेक धरणांची पातळी धोक्याजवळ पोहोचली आहे. परिणामी टिटवाळा आणि आसपासच्या खालच्या भागातील वसाहतींमध्ये पाणी घुसून जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरवली, रुंदा, काळू, उल्हास व वासुंद्री या नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. गुरवली पूल, रुंदा व वासुंद्री नदीवरील पूल तसेच मोहिली गावाजवळील रस्ते बंद असल्यामुळे बल्याणी, मानिवली, घोटसई, मोहिली या गावांमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी चिंतित झाले असून, भातपिके पाण्यात बुडण्याची शक्यता वाढली आहे.
टिटवाळा शहरातही पावसाचा कहर कायम असून, निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक, मधुबन सोसायटी, इंदिरानगर, रायभोळे निवास, नारायण नगर, मांडा स्टेशन परिसरात घरे, दुकाने आणि रस्त्यांत पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डीजी वनसमोरील पटेल मार्ट रोड, गणपती मंदिर रोडसह अनेक प्रमुख मार्गांवर पाण्याचे तळी तयार झाला आहेत. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
टिटवाळा रुग्णालयाला येणाऱ्या रुग्णवाहिकांनासुद्धा पावसामुळे अडथळा येत असून, त्यांना गैरसोयी सहन कराव्या लागत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, परिणामी पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून ते घरगुती सुविधांपर्यंत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बारवी धरणाची पातळी वाढली असून, पिसे धरणातही पाण्याचा वेगाने ओघ सुरू आहे. मुंबईसाठी पाणीपुरवठा करणारे सातही जलाशय क्षमतेपेक्षा जास्त भरलेले असल्याची माहिती मिळाली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत अजूनही मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशी महापुराची भीती, रस्त्यांवरील पाणी व आरोग्यसेवा धोक्यात येते. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न केल्याबद्दल नागरिक नाराज आहेत. विशेषतः प्रसूतिगृह, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे वारंवार बुडण्याची समस्या कायम राहिल्यास मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची गैरसोय
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे टिटवाळा शहरातील मांडा स्मशानभूमी परिसर तसेच माउली साईराज नगरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या भागातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने २३२ क्रमांकाच्या फिडरवरील वीजपुरवठा तात्पुरता बंद केला आहे. परिणामी परिसरातील अनेक घरांमध्ये अंधार पसरला असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पाणी ओसरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे वीज वितरण विभागाने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.