मंत्री गणेश नाईकांच्या वक्तव्याने १४ गाव ग्रामस्थ नाराज
गणेश नाईकांच्या वक्तव्याने १४ गाव नाराज
१४ गावांचा एकनाथ शिंदेंसोबत राहण्याच्या निर्णयः पालिका निवडणुकीत रंगणार कलगीतुरा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तथा नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेली १४ गावे निवडणुकीनंतर पालिकेतून वगळण्यात येतील, असे वक्तव्य मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा केले. त्यांच्या या वक्तव्याने ग्रामस्थ मात्र नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या विधानाचा निषेध करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्धार केला आहे. यामुळे आगामी पालिका निवडणुकीत १४ गावांत भाजप विरुद्ध शिंदे गट व ग्रामस्थ असा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळेल.
कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेशाला गणेश नाईक यांचा प्रखर विरोध दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांनंतर १४ गावे नवी मुंबईतून वगळण्यात येतील, असा निर्वाळा नाईक यांनी दिला. यामुळे १४ गावांतील ग्रामस्थ नाराज झाले आहेत. नाईक म्हणजे भाजप नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला पाठिंबा असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्धार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
१४ गाव समितीचे पदाधिकारी असलेले जीवन वालीलकर म्हणाले की, त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आमच्या समाजाच्या नेत्याने आपल्याच लोकांची विकासकामे थांबविण्याचे काम केले आहे. आमच्या गावांच्या कामांना चालना देण्याचे काम नेहमी शिंदेंनी केले आहे. भविष्यातही १४ गाव एकनाथ शिंदेंसोबत राहणार असल्याचे वालीलकर यांनी सांगितले आहे, तर आमदार मंदा म्हात्रे यांनी सामाजिक भान ठेवून आपल्या समाजातील लोकांचा विकास होतो ही बाब लक्षात घेऊन स्वतः भाजपमध्ये असूनही १४ गावांना पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रभागरचनेत १४ गावांचा समावेश
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात जीआर निघाला असला तरी अद्याप गावांची दप्तरं पालिकेत जमा केलेली नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण होते. पालिका निवडणुकीत नवी मुंबई पालिकेने प्रभागरचना जाहीर करताना १४ गावांचादेखील समावेश केला. यामुळे ग्रामस्थांना आपले घोडे अखेर गंगेत न्हाले असेच वाटतं होते.
१४ गावांमध्ये आपला समाज असूनसुद्धा गणेश नाईक त्यांना का मागे ढकलत आहेत, हे समजत नाही. निवडणुकीमध्ये १४ गावांमध्ये शिंदे यांची सत्ता येईल याची भीती त्यांना वाटत असेल. त्यामुळे तेही राजनीती करत असावे. त्यांच्या या विधानामुळे १४ गावांतील ग्रामस्थ मात्र नाराज आहेत.
- सुखदेव पाटील, ग्रामस्थ
१४ गावांविषयीचा जीआर निघून दीड वर्ष झालं. मंत्री नाईकांनीही त्याला हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र, गेल्या एका वर्षात असं काय झालं की १४ गावांना एवढा ते विरोध दर्शवत आहेत. नक्की त्यांचा द्वेष हा कोणासाठी आहे.
- विजय पाटील, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.