मुंबईकरांना भुयारे रेल्वेचे नवे स्वप्न
मुंबईकरांना भुयारी रेल्वेचे नवे स्वप्न
रखडलेले प्रकल्प आधी पूर्ण करा; प्रवासी संघटनांमधून संतापाचा सूर
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईत रेल्वे प्रवाशांची रोजची धावपळ, जीवघेणी गर्दी, अपघातांचा धोका आणि गाड्यांचा उशीर... हे चित्र वर्षानुवर्षे कायम आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेकडून मोठमोठे प्रकल्प जाहीर केले गेले, मात्र बहुतेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. कुर्ला-सीएसएमटी पाचवी-सहावी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका असे कितीतरी महत्त्वाचे प्रकल्प आजही अपूर्ण आहेत. त्यातच आता मुंबईकरांना ‘भुयारी रेल्वे’चे नवीन स्वप्न दाखवले जात आहे. जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चेष्टा करण्याचा हा प्रकार असल्याचा सूर प्रवासी संघटनांमधून उमटत आहे.
---
निवडणुकीच्या तोंडावर नवा गाजावाजा
मुंबईकरांसाठी वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची ताकद रेल्वेकडे नाही, उलट प्रत्येक प्रकल्पाचा खर्च वाढतोय. तरीही रेल्वे प्रशासनाने निवडणुकीच्या तोंडावर भुयारी मार्गिकेचा गाजावाजा सुरू केला आहे. प्रवासी संघटनांचा आरोप स्पष्ट आहे. हा सर्व प्रकार म्हणजे सरळसरळ फसवणूक आणि निवडणूक स्टंट आहे, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
जपानी कंपन्यांकडे व्यवहार्यता तपासणी
या भुयारी प्रकल्पासाठी जपानी संस्था ‘पेडेको’ आणि ‘पॅसिफिक’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांना दिली आहे. यासाठी एमआरव्हीसीकडून या कंपन्यांना पैसेही देण्यात आले आहे, मात्र आधीच अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची ताकद रेल्वेकडे नसताना, जनतेच्या पैशांचा असा अपव्यय योग्य आहे का, असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.
कुर्ला-सीएसएमटी मार्गिका केवळ कागदावरच
मध्य रेल्वेच्या सर्वाधिक गर्दीच्या कॉरिडॉरवर पाचवी-सहावी मार्गिका प्रवाशांसाठी जीवनरेखा ठरली असती. २००२ मध्ये सुरू झालेल्या एमयूटीपी-२ प्रकल्पात या मार्गिकेचा समावेश करण्यात आला. सीएसएमटी ते कुर्ला यादरम्यानची पाचवी सहावी मार्गिका अजूनही प्रलंबित आहे. जमीन संपादन, निधीअभावी आणि प्रशासनातील गोंधळामुळे हा प्रकल्प आजही थांबलेला आहे. तब्बल आठ हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पाची कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत. प्रवासी मात्र रोज गर्दीत चिरडले जात आहेत.
प्रवाशांचा रोष
निवडणुकीच्या तोंडावर भुयारी रेल्वेची बातमी समोर केली जाते, पण प्रत्यक्षात जुन्या प्रकल्पांवर भाष्य करण्यास कुणीही तयार नाही. काम पूर्ण करण्याच्या तारखा संपतात, परंतु कामांना गती मिळत नाही. गाड्या उशिरा धावतात, अपघात वाढतात आणि प्रवासी नरकयात्रा करतात. हा प्रकार थांबला पाहिजे.
-सुभाष हरिचंद्र गुप्ता
अध्यक्ष, रेल यात्री परिषद
ठाण्याच्या पुढे कर्जत, कसारा, बदलापूर भागातून रोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात, पण त्यांची पर्यायी सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही सोय नाही. गर्दीत चिरडले जाताना कित्येक प्रवासी जीव गमावत आहेत. रेल्वेने आधी ही कामे पूर्ण करावीत आणि मगच भुयारी रेल्वेचे स्वप्न रंगवावे.
- लता अरगडे,
अध्यक्षा, उपनगरी प्रवासी महासंघ
प्रलंबित प्रकल्पांची यादी
* सीएसएमटी-कुर्ला पाचवी व सहावी मार्गिका
* बोरिवली-मुंबई सेंट्रल सहावी मार्गिका (१७ वर्षे प्रलंबित)
* विरार-डहाणू चौथा ट्रॅक (९ वर्षे प्रलंबित)
* पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग (९ वर्षे प्रलंबित)
* ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका
* कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका (६ वर्षे प्रलंबित)
* कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका (६ वर्षे प्रलंबित)
* बदलापूर-कर्जत तिसरी व चौथी मार्गिका प्रलंबित
* आसनगाव-कसारा चौथी मार्गिका - २ वर्षे प्रलंबित)
पनवेल-वसई नवा उपनगरी मार्ग -२ वर्षे प्रलंबित
दररोज तब्बल ७५ लाख प्रवासी लोकलमध्ये प्रवास करतात. गर्दी, अपघात, उशीर या सर्व समस्यांवर उपाय म्हणून २००२ मध्ये मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) सुरू झाला. हजारो कोटी खर्चूनही कुर्ला-सीएसएमटीसारखी महत्त्वाची कामे अजूनही रखडलेली आहेत. त्यामुळे भुयारी रेल्वेचे स्वप्न दाखवण्याआधी रेल्वेने जमिनीवरील काम पूर्ण करून आपली क्षमता सिद्ध करावी.
-नंदकुमार देशमुख,
अध्यक्ष, प्रवासी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.