दि.बा.पाटील साधेसुधे नव्हते रे बाबा.

दि.बा.पाटील साधेसुधे नव्हते रे बाबा.

Published on

भूमिपुत्रांचा पुन्हा एल्गार
दि. बांच्या नावासाठी डिसेंबरमध्ये महाआंदोलनाची हाक; गावागावात फलकबाजी
सकाळ वृत्तसेवा,
डोंबिवली, ता. १३ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा संघर्ष सुरूच आहे. विमानतळ उद्घाटनाच्या वेळी नामांतराची घोषणा होण्याची आशा भूमिपुत्रांना होती, मात्र सरकारने ती न केल्याने त्यांचा हिरमोड झाला. यामुळे संतप्त झालेल्या भूमिपुत्रांनी पुन्हा एकदा संघर्षाची हाक देत, येत्या ३ डिसेंबरला महाआंदोलन छेडण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नुकतेच झाले. राज्य सरकारने नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचे सांगितले जात असले तरी, जोपर्यंत नामघोषणा होत नाही, तोपर्यंत भूमिपुत्रांचा विश्वास बसत नाही. उद्घाटनाच्या दिवशीही घोषणा न झाल्याने भूमिपुत्रांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, तर मनसेचे नेते राजू पाटील यांनी ‘‘ज्या दिवशी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे, अशी घोषणा होईल, त्याच दिवशी या विमानतळाचे अधिकृत उद्घाटन झाले, असे आम्ही म्हणू’’ असे म्हणत टीका केली होती. या संघर्षादरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळाचे नामांतर दि. बा. पाटील यांच्या नावाने होईल, असे आश्वासन दिले होते, मात्र ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटनाच्या वेळी एकाही नेत्याने याबद्दल उल्लेख केला नाही. त्यामुळे भूमिपुत्र कमालीचे नाराज झाले आहेत.

सरकारला ‘जागे’ करण्यासाठी फलक
सरकारला दि. बा. पाटील कोण होते, त्यांच्या संघर्षाची जाणीव आणि ओळख करून देण्यासाठी भूमिपुत्र सरसावले आहेत. कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, बदलापूर, भिवंडी, अंबरनाथ, १४ गावे आणि नवी मुंबई परिसरातील गावांच्या वेशीवर ‘आंधळ्या, मुक्या, बहिऱ्याचे सोंग घेणाऱ्या राज्यकर्त्यांनो’ असे म्हणत, दि. बा. पाटलांच्या कार्याची आठवण करून देणारे फलक (बॅनर) ग्रामस्थांनी लावले आहेत. या फलकातून राज्यकर्त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

डिसेंबरमध्ये महाआंदोलन
रविवारी दिघा येथे झालेल्या भूमिपुत्र सामाजिक संघाच्या नियोजन बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे यांनी भूमिपुत्रांच्या भूमिकेचे कौतुक केले. तसेच डिसेंबर महिन्यात महाआंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार म्हात्रे यांनी स्वतः माणकोली ते नवी मुंबईदरम्यान फलक लावण्याचे आश्वासन दिले आहे. दि. बा. नामकरणासह स्थानिक मुख्य प्रश्नांना घेऊन प्रत्येक सागरी तालुक्यात सभा घेण्यात आल्या आहेत. खासदार म्हात्रे आणि सहकारी भूमिपुत्रांच्या सामाजिक संस्थांचा एल्गार येत्या ३ डिसेंबरला सरकारला दिसून येईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला नवी मुंबई विमानतळाचे नामांतर लोकनेते दि. बा. पाटील होईल असे आश्वासन दिले, परंतु ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाच्या उद्घाटनाला एकाही नेत्याने नामांतरणाबद्दल ब्र काढला नाही. त्यामुळे भूमिपुत्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक सागरी तालुक्यात दि. बा. नामकरण सोबतच तेथील मुख्य प्रश्नांना घेऊन जागोजागी सभा घेण्यात आल्या. खासदार म्हात्रे आणि सहकारी भूमिपुत्रांच्या सामाजिक संस्थांचा एल्गार येत्या ३ डिसेंबरला सरकारला दिसून येईल. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासाठी महाआंदोलन करण्यात येणार आहे.
- सर्वेश रवींद्र तरे, भूमिपूत्र, आगरी साहित्यिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com