अवकाळीने मच्छीमारही चिंताग्रस्त

अवकाळीने मच्छीमारही चिंताग्रस्त

Published on

वसई, ता. २८ (बातमीदार) : गेला आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. गेले सात-आठ दिवस होणारा बेभरवशी पाऊस, वादळ, वारे यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मच्छीमार चिंताग्रस्त आहेत.

वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम सर्वत्र दिसून येऊ लागला आहे. जीव मुठीत घेऊन सागरी प्रवास करीत मच्छीमार मासेमारी करतात. त्यासाठी सामग्री, जाळे व अन्य सामानाची जमवाजमव केली जाते. व्यवसायातून चांगली कमाई होईल आणि मजुरांना वेतन मिळेल, अशी आशा असते. परंतु समुद्रातील चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, हवामानात होणारे बदल पाहता त्यांच्या पदरी निराशा पडते. पावसाळ्यात मासेमारी बंद असते. त्यातच आठ महिन्यांत अनेकदा नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने मासेमारीवर परिणाम होऊ लागला आहे. अवकाळी पावसामुळे मासेमारीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यवसाय करताना आर्थिक चणचण भासू लागली आहे. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता मच्छीमारांसमोर निर्माण होऊ लागली आहे.

विरार-अर्नाळा किनाऱ्यावर साधारण ९० ते १०० बोटी आहेत. सागराशी संघर्ष करून किनाऱ्यावर आणलेली मच्छी पाऊस आल्याने बाहेर न काढता समुद्रावर फेकावी लागली. एका बोटीमागे १०० पाटी धरली तरी किमान लाखाचे नुकसान एका बोटीला झाले आहे. हे सर्वसाधारण नुकसान एका दिवसाचे आहे. बाकी बर्फ, इंधन, रेशन, अन्य सामान हा खर्च वेगळा आहे. मजुरांना विकत घेतलेली मच्छी दिवसभर राबूनही अपेक्षित परतावा देत नाही. दिवाळीच्या मोसमात सुकलेली मच्छी दर्जेदार समजली जाते. संपूर्ण कोळीवाड्यात किनारपट्टीवर हीच परिस्थिती आहे. यामुळे कोळी भगिनींनी नाराजी व्यक्त केली आहे.

मदतीची प्रतीक्षा

पालघर समुद्रकिनारी अनिश्चित नैसर्गिक संकट घेराव घालत आहे. मासेमारी व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. मेमध्ये हीच परिस्थिती होती. वादळी वारे, अवकाळी पावसाने बोटी माघारी आल्या होत्या. बोटींचेदेखील नुकसान झाले होते. आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मासेमारी व त्यावर अवलंबून असणारे कामगार, व्यावसायिक, स्थानिक बाजारपेठेत मासे विक्री करणाऱ्या महिला तसेच बोटींचे मालक आदींना फटका बसला आहे. यामुळे ते सरकारकडून मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.

अवकाळी पावसाने मासेमारीवर परिणाम होत आहे. सुक्या मासळीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने याकडे लक्ष घालून कोळी बांधवांना मदतीचा हात द्यावा.
- जयवंती रामकृष्ण इवलेकर, कोळी महिला, अर्नाळा

वसई : अर्नाळा समुद्रकिनारी वाळत घातलेल्या बोंबलाचे पाऊस आणि वाऱ्यामुळे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com