जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास कामात परिवर्तन शक्य

जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास कामात परिवर्तन शक्य

Published on

जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास कामात परिवर्तन शक्य
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे प्रतिपादन
कल्याण, ता. १ (वार्ताहर) ः महापालिकेच्या वर्धापनदिन सोहळ्यात आयुक्त अभिनव गोयल यांनी, प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास कामात चांगले परिवर्तन होणे शक्य आहे, असे प्रतिपादन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगली, पारदर्शक आणि गतिमान सेवा दिल्यास महापालिकेची कीर्ती देशपातळीवर पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले. महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांच्या दोन राजांची गोष्ट या संकल्पनेतून आचार्य प्र. के. अत्रे रंगमंदिरात हा भव्यदिव्य कार्यक्रम गुरुवारी (ता. ३०) आयोजित करण्यात आला होता.

आयुक्तांनी या दिनानिमित्त शुभेच्छा देत हा दिवस स्वत:साठी आत्मचिंतन करण्याचा असल्याचे सांगितले. प्रशासनात प्रत्येकाचे कार्य महत्त्वाचे आहे, ही जाणीव ठेवून काम करावे. कर्मचाऱ्यांच्या सर्जनशील पैलूंना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, लवकरच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ताणतणावाचे व्यवस्थापन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षण आयोजित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

इतिहासाचा जागर
सुरेश बनसोडे यांच्या लेखन, मार्गदर्शन आणि नेपथ्याखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना व देशभक्तीपर गीताने झाली.
प्रथमच नृत्य-नाट्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट, त्यांचे प्रबोधनात्मक कार्य आणि विचारधारेचे अत्यंत प्रभावी सादरीकरण महापालिकेच्या अधिकारी- कर्मचारीवर्गाने केले.

ऐतिहासिक भूमिका
महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेतील माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्तिरेखा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी साकारल्या. विशेष म्हणजे, महापालिकेचे वाहनचालक प्रकाश वाघ यांनी साकारलेली ‘कडक लक्ष्मी’ वन्स मोअरची दाद घेऊन गेली. कार्यक्रमाचा कळस मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि नयनरम्य शिवराज्याभिषेक सोहळ्याने चढवला. महेश देशपांडे यांचे कौशल्यपूर्ण निवेदन आणि नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर मोहर उमटवली.

पुरस्कारांचे वितरण
या सोहळ्यात सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक श्री गणेशदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच, आशिया खंडातील सर्वात उंच शिखरावरून (सुमारे ८,००० फूट) पॅराग्लायडिंग करत वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देणारे कर्मचारी अक्षय गायकवाड यांनाही आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी उपायुक्त संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर सर्व उपायुक्त, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com