फेरफार सेवेसाठी आता तहसील कार्यालयात धाव
फेरफार सेवेसाठी आता तहसील कार्यालयात धाव
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट; ठाकरे गटाकडून तीव्र निषेध
कर्जत, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन फेरफारसंबंधित कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच तहसीलदार कार्यालयाकडून काढलेल्या नव्या आदेशानुसार, फेरफारची कामे आता संबंधित गावातील तलाठी कार्यालयात नव्हे, तर थेट कर्जत तहसील कार्यालयातच करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही योजना केवळ नावापुरतीच राहिल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच फेरफारची सोय उपलब्ध असल्याने वेळ, खर्च आणि श्रम वाचत होते. मात्र आता गावोगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात जावे लागणार असून, त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च, श्रम आणि वेळ वाया जाणार आहे. नांदगाव, खांडस, पिंपळगाव, भोसलेवाडी परिसरातील शेतकऱ्यांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. दररोज शेतीच्या कामात व्यग्र असलेल्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात वारंवार फेरफटका मारावा लागणे त्रासदायक ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने या आदेशाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाला निवेदन देऊन हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने सुलभ सेवा द्याव्यात, त्यांना दारोदारी फिरवू नये, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी ठाकरे गटाने दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात तहसील प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

