आंबा उत्पादक शेतकरी संकटात

आंबा उत्पादक शेतकरी संकटात

Published on

वाणगाव, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा मेपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संततधारेचा विपरीत परिणाम आंबा बागायतदारांवरदेखील होणार आहे. सततच्या पावसामुळे पालवी उशिरा आल्याने त्याचा थेट परिणाम डिसेंबर, जानेवारीमध्ये येणाऱ्या मोहोरावर होणार आहे. त्यामुळे या हंगामात मोहोर उशिरा येऊन एकंदरीत आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा तसेच लांबत असलेला पाऊस, ढगाळ वातावरण, दमटपणा, आर्द्रता त्यामुळे एकंदरीत वातावरणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. यावर्षी नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. यंदा पावसाळी हंगाम संपला तरीही अवकाळीचे संकट आजही आहे. पावसाळ्याचे दिवस संपले तरीही अवकाळी सुरू असल्याने आंबापिकावर परिणाम होऊन आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबणार असल्याचे चित्र आहे.

अवकाळीमुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात उशिराने आलेल्या पालवीचा डिसेंबर, जानेवारीमध्ये येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. अवेळी येणारा पाऊस अजून काही दिवस सातत्य राहिल्यास यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. एकंदरीत आंबा हंगाम आणि बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे.

सतत पावसामुळे मोहोरापूर्वी आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात पालवी आहे. त्याचा थेट परिणाम डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर होऊन उशिरा येणाऱ्या मोहोरामुळे आंबा व्यवसायातून होणाऱ्या उलाढालीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्वसाधारण स्थिती
दरवर्षी सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस गेल्यावर जमिनीतील पाण्याचा ओलावा कमी होऊन पाण्याचा ताण बसतो. जमीन सुकी होते. ऑक्टोबर हीट आणि थंडीला सुरुवात होते. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडीमुळे झाडाला चांगली आणि भरगच्च पालवी फुटण्यास मदत होते. त्यानंतर साधारणतः दोन महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पालवीतून मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू होते.

यंदाची स्थिती
यंदा परतीचा पाऊस परतला असला तरीही अवकाळीचे संकट आजपर्यंत सुरूच आहे. अशातच आंब्याच्या झाडांना पालवी आली आहे. सतत पाऊस सुरू असल्याने जमिनीमध्ये ओलावा असून जमिनीला पाण्याचा ताण अजिबात बसला नाही. आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्यास पोषक असणारी ऑक्टोबर हीट आणि थंडी यांचे समीकरण नोव्हेंबर उजाडला तरीही जुळले नाही. आता पालवी फुटत असल्याने ती परिपक्व होण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंब्याला मोहोर साधारणतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात येणार असल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

यंदा नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे मोहोर येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले नसून, मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडावर पालवी फुटत आहे. यामुळे मोहोर लांबणीवर जाऊन उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे. नव्या पालवीमुळे तुडतुड्याचा प्रादुर्भावही लवकरच दिसून येत आहे. त्यामुळे हा हंगाम आंबा उत्पादकांसाठी कसोटीचा असणार आहे.
- सुदीप म्हात्रे, आंबा उत्पादक शेतकरी, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com