मिरा भाईंदरची मेट्रो कारशेड रद्द

मिरा भाईंदरची मेट्रो कारशेड रद्द

Published on

मिरा भाईंदरचे मेट्रो कारशेड रद्द
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : डोंगरी गावात होत असलेले प्रस्तावित मेट्रो कारशेड रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याशिवाय मेट्रो मार्ग भाईंदर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणीच समाप्त होणार आहे. मूर्धा व राई येथील दोन मेट्रो स्थानकेदेखील रद्द करण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
दहिसर येथून मिरा-भाईंदरमध्ये येणारी मेट्रो मोर्वा गावापर्यंत विस्तारण्यात आली होती. त्याच्या कारशेडसाठी डोंगरी गावातील सरकारी जागेची निवड करण्यात आली होती. ही जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरदेखील झाली. एमएमआरडीएने कारशेड उभारणीची निविदा प्रक्रियादेखील केली. मात्र कारशेड उभारण्यासाठी त्या जागेत असलेल्या सुमारे १२ हजार झाडांचा बळी जाणार होता. या वृक्षतोडीला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध करण्यात आला. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने कारशेड रद्द करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी केली. त्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. साखळी आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. असे असताना काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या उत्तन व आसपासच्या गावांसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखड्यात मेट्रो कारशेडचे आरक्षण डोंगरी गावातील प्रस्तावित ठिकाणीच दाखविण्यात आल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
आता लोकांच्या विरोधाची दखल घेत एमएमआरडीएने डोंगरी गावातील प्रस्तावित मेट्रो कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएकडे नुकत्याच घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यासंदर्भातील अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यासोबतच मेट्रो मार्ग मोर्वा गावापर्यंत विस्तारण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे. मूर्धा व राई ही दोन स्थानके आता होणार नाहीत. त्यामुळे मिरा-भाईंदरची मेट्रो भाईंदरजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळच समाप्त होणार आहे. भाईंदरची मेट्रो वसई-विरारच्या दिशेनेही जाणार आहे. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ मेट्रो मार्गाला दोन ठिकाणी रॅम्प देण्यात येणार आहे. भाईंदरची मेट्रो या रॅम्पवरून खाली जाईल व पुन्हा दुसऱ्या रॅम्पद्वारे दहिसरच्या दिशेने जाईल. त्यामुळे डोंगरी येथे मेट्रो कारशेड बांधण्याची आवश्यकता राहणार नाही. मेट्रोची देखभाल-दुरुस्ती मुंबईतील गोरेगाव येथील कारशेडमध्येच होईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
----
१२ हजार झाडांना जीवदान
कारशेड उभारण्यासाठी त्या जागेत असलेल्या सुमारे १२ हजार झाडांचा बळी जाणार होता. या वृक्षतोडीला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध करण्यात आला. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने कारशेड रद्द करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी केली. त्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. तसेच साखळी आंदोलनही करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com