आज टीईटी परीक्षेविरोधात शिक्षकांचा एल्गार
आज टीईटी परीक्षेविरोधात शिक्षकांचा एल्गार
जिल्हाधिकार्यालयावर देणार धडक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्र पुरते ढवळून निघाले आहे. पहिली ते आठवी वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावे या मुख्य मागणीसाठी जिह्यातील शिक्षकांनी एल्गार पुकारत मुकमोर्चाचे आयोजन केले आहे. जिह्यातील हजारो शिक्षक रविवारी (ता. ९) मुकमोर्चाद्वारे एकवटणार आहेत.
टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी व अन्य मागण्याच्या संदर्भात ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मध्यवर्ती समन्वय समितीने रविवार मोर्चाचे आयोजन केले आहे. राज्य सरकारने १५ मार्च रोजी संचमान्यतेसंदर्भात काढलेल्या आदेशामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे हा आदेश रद्द करणे, आरटीई अधिनियमात दुरुस्ती करावी, ऑनलाईन कामाचा अतिरिक्त ताण, वाढते अध्यापनबाह्य व शाळाबाह्य कामांमुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. त्यातच टीईटी परीक्षेच्या सक्तीमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे हजारो शिक्षक मोर्चात सामील होऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटणार आहेत.
टीईटी सक्तीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. केवळ पदोन्नतीच नव्हे तर सेवेत राहण्यासाठी देखील दोन वर्षात ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे केल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून पुनर्विचार याचिका दाखल करून भक्कमपणे बाजू मांडावी अगर सर्वमान्य तोडगा काढावा ही शिक्षकांची प्रमुख मागणी आहे.
- ॲड. राजकुमार पाटील, कायदेशीर सल्लागार, राज्य शिक्षक सेना
*********************
जिल्ह्यातील १७ हजार ३३ उमेदवार देणार शिक्षक पात्रता परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार (ता. २३) पार पडणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील एकूण ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून १७ हजार ३३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील परीक्षेसाठी पेपर-I साठी ७ हजार ८०३ आणि पेपर-II साठी ९ हजार २३० उमेदवारांनी अर्ज केला आहे. पेपर-I सकाळी १०.३० ते दुपारी १ व पेपर-II दुपारी २ ते ४.३० या वेळेत होईल. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवणार असून राज्य परीक्षा परिषदेमार्फत सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करून सर्व परीक्षा केंद्रांशी सातत्याने संपर्क सुरू आहे.
सर्व उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करावे, केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुरक्षा, आसनव्यवस्था आणि पर्यवेक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांच्या गुणवत्तेचे प्रतीक असून या माध्यमातून गुणवत्ता धारक शिक्षक प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
- बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

