दीपेश यांच्या प्रवेशामागे कोण

दीपेश यांच्या प्रवेशामागे कोण

Published on

दीपेश यांच्या प्रवेशामागे कोण?
भाजपमधील ‘इनसाईड गेम’ची चर्चा
शर्मिला वाळुंज, सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामागे स्थानिक पातळीवरील नेतृत्व नव्हे, तर थेट पक्षातील वरिष्ठ पातळीचा हात असल्याच्या चर्चांनी सध्या कल्याण-डोंबिवलीचे राजकारण पेटले आहे. विशेषतः हा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात डोंबिवली पश्चिमेतील म्हात्रे घराण्याचे अस्तित्व नेहमीच प्रभावी राहिले आहे. महापालिकेच्या राजकारणात तर म्हात्रे कुटुंबाचा अनेक वर्षांपासून दबदबा आहे. त्यामुळेच ठाकरे गट सोडून दीपेश म्हात्रे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करताच स्थानिक राजकीय समीकरणांना पूर्णत: नवीन वळण मिळाले. हा प्रवेश वरकरणी भाजपसाठी बळ देणारा असला तरी या प्रवेशाच्या पडद्यामागे चाललेल्या हालचाली, त्यातून भाजपच्या गोटात निर्माण झालेली नाराजी आणि आगामी महापालिका निवडणुकीचे परिणाम यावर सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

म्हात्रे यांच्या प्रवेशाची संपूर्ण पटकथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहभागाने तयार झाल्याचे भाजपच्या अंतर्गत गोटातच कानावर येत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला स्थानिक प्रभाव असलेल्या नेतृत्वाची गरज होती. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा काही ठिकाणी टिकून असलेला प्रभाव भाजपला त्रासदायक वाटत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हात्रे घराण्याचा भाजप प्रवेश हा फडणवीसांनी आखलेला रणनीतिक डाव असल्याचे मानले जात आहे; मात्र हा डाव स्थानिक नेतृत्वाच्या मनाला किती पटला, हा खरा प्रश्न आहे.

पक्षप्रवेशाच्या दिवशीच अनेकांच्या चेहऱ्यांवरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. भाजपच्या स्थानिक पातळीवरील काही ज्येष्ठ पदाधिकारीदेखील नाराज असून, त्यांच्या मनातील खदखद त्यांनी बोलून दाखवली. वर्षानुवर्षे संघ-भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष तळापासून उभा केला. अशा मतांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक कार्यकर्ते बाहेरून येणाऱ्या नेत्याला दिलेले महत्त्व पचवू शकले नाहीत. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याही चेहऱ्यावर विशेष उत्साह नव्हता, अशी चर्चाही कार्यक्रमानंतर लगेच सुरू झाली. म्हणजेच वरून प्रवेश मंजूर असला, तरी खालील पातळीवर हा निर्णय कितपत स्वीकारला जातोय, हे अजून स्पष्ट नाही.

या नाराजीचा राजकीय अर्थ काढायचा, तर परिस्थिती भाजपसाठी काहीशी त्रासदायक म्हणावी लागेल. कारण नाराज फळीचा कल शिंदे गटाकडे झुकू शकतो, असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. शिंदे गटाला केडीएमसीच्या मैदानात आपला प्रभाव वाढवण्याची गरज आहे आणि भाजपमधील नाराज कार्यकर्ते त्यांच्यासाठी मोठी संधी ठरू शकतात. भाजप-शिंदे गट युती असली, तरी दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते अनेक ठिकाणी एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. अशा वेळी नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शिंदे गट सहजपणे आकर्षित करू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच म्हात्रे घराण्याचा प्रवेश हा भाजपसाठी ‘पॉवर बूस्टर’ ठरणार की ‘बॅकफायर’, हे आगामी काही महिन्यांतच स्पष्ट होणार आहे. फडणवीसांनी आखलेला रणनीतिक डाव किती परिणामकारक ठरेल आणि स्थानिक स्तरावरील नाराजी किती वाढेल, या दोन गोष्टींवरच डोंबिवली-कल्याणचे पुढचे राजकीय समीकरण ठरणार आहे; मात्र सध्या म्हात्रेंच्या प्रवेशाने भाजपचे समीकरण मजबूत होण्याइतकंच गोंधळलेलंही दिसत आहे.
---------
कार्यकर्ते नाराज?
सगळ्या परिस्थितीत सर्वात मोठे आव्हान प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासमोर उभे आहे. म्हात्रेंच्या प्रवेशामुळे बाहेरून भाजपची ताकद वाढल्याचे चित्र जरी तयार झाले, तरी संघटनेची अंतर्गत एकजूट ढासळू नये, नाराज कार्यकर्ते तुटू नयेत आणि महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण व्हावी, यासाठी मोठी समजूतदार भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण नाराजीचं बी जरी छोटं असलं तरी निवडणुकीच्या वेळी ते फूट पाडू शकतं आणि त्याचा मोठा राजकीय खर्च भाजपला मोजावा लागू शकतो, असे बोलले जातं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com