लोकवस्तीत भटक्या कुत्र्यांचे निवारे नको!
लोकवस्तीत भटक्या कुत्र्यांचे निवारे नको!
मुलुंडमध्ये स्थानिकांचा निवारा केंद्राला विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू लागली असून, भटकी कुत्री नागरिकांवर हल्ला करीत आहेत. दुचाकींचा थरारक पाठलाग करताना कुत्रे दिसतात. त्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून आता पालिकेने भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुलुंड येथे निवारा केंद्र उभारण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
मुलुंड येथे धारावीतील स्थलांतरित नागरिकांचे पुनर्वसन करण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला होता. येथे कबुतरखाना सुरू करण्यासही स्थानिकांचा विरोध आहे. आता येथे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यालाही स्थानिकांचा विरोध होऊ लागला आहे.
मुंबईतील भटक्या कुत्र्यांना हटवून निर्बीजीकरण, लसीकरणानंतर त्यांना निवारा केंद्रात सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासन निवारा केंद्रे उभारण्याच्या कामाला लागले आहे. मुंबईत सुमारे ९० हजारांहून अधिक भटके कुत्रे असून, त्यांच्यासाठी शहरात केवळ आठच अधिकृत निवारा केंद्रे आहेत. मुलुंड येथे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याला स्थानिक विरोध होऊ लागला आहे.
भटकी कुत्री चावण्याच्या घटना वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेल्वेस्थानके, क्रीडांगणे आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांना हटवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवली आहे. त्यानुसार महापालिकांनी उपलब्ध सुविधांचा आणि क्षमतेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, निवारा केंद्रे उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
निवारा केंद्रात सुविधा
या केंद्रांसाठी प्रशिक्षित श्वानपालन कर्मचारी, पशुवैद्य, सातत्याने अन्न-पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षेची व्यवस्था या सर्व सुविधा पालिका प्रशासनाला पुरवाव्या लागणार आहेत.
नवीन निवारा केंद्रे
शहरातील किमान ३० ते ४० टक्के भटक्या कुत्र्यांचा सार्वजनिक ठिकाणी त्रास होत आहे. यामुळे त्यांना हलविण्यासाठी किमान ४० हजार कुत्र्यांची क्षमता असलेली नवी निवारा केंद्रे तातडीने उभारण्याची योजना आहे.
कुत्र्यांची संख्या वाढली
मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणात मुंबईतील १९ वॉर्डांत रस्त्यावरील श्वानांची संख्या २१.८ टक्के तर भायखळा, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड या पाच वॉर्डांत कुत्र्यांची संख्या १९.९ टक्क्यांनी वाढली असल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

