विक्रोळीमध्ये पोलिस बंदोबस्तात मनपाची इमारत रिकामी
विक्रोळीत पोलिस बंदोबस्तात
मनपाच्या इमारतीवर कारवाई
घाटकोपर ता. १८, निलेश मोरे (बातमीदार) ः विक्रोळी पार्कसाइट परिसरातील महानगरपालिकेच्या तीन इमारतींना मंगळवारी (ता. १८) पोलिस बंदोबस्तात रिकामे करण्यात आले. ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने येथे नवीन टॉवर उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र येथील काही रहिवाशांच्या विरोधामुळे अनेक दिवसांपासून ही कारवाई प्रलंबित होती.
मनपा अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेत क्रमांक २२, २३ आणि २४ या इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू केली. कारवाईदरम्यान काही रहिवाशांनी तीव्र विरोध केल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या काळात पोलिस व रहिवाशांमध्ये धक्काबुक्की झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या वेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचेही निदर्शनास आले आहे.
परिसरातील काही समाजसेवकांच्या पाठिंब्याने बाहेरून काही लोकांना आणून मनपाच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी आधीच खबरदारी घेत गर्दी हटवली. या इमारतींतील अनेक रहिवासी स्थलांतरित झाले होते; परंतु काही जण अद्याप राहते घर सोडण्यास इच्छुक नव्हते. ‘मी गेली चाळीस वर्षे येथे राहतो. जबरदस्तीने आम्हाला खाली करण्यात येत आहे. आमची मुलं येथे शिकतात.’ अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी तीर मोहम्मद यांनी दिली, तर ‘अनेक वर्षे आम्ही येथे राहतो, आम्हाला दूर पाठवलं जात आहे. अचानक आम्हाला येथून काढण्यात येत आहे, असे रहिवासी सचिन बागुल यांनी सांगितले.
.........................
इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना पीएपी योजनेअंतर्गत भांडुप येथील ओबेरॉय रिॲल्टीच्या टॉवरमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. रहिवाशांना याबाबत अनेकदा नोटीस देण्यात आली असून, टॉवरचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणीच त्यांना कायमस्वरूपी घरे देण्यात येणार आहेत.
गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त, एन विभाग

