उल्हासनगर’ राजकारणाचे केंद्रबिंदू

उल्हासनगर’ राजकारणाचे केंद्रबिंदू

Published on

उल्हासनगर महायुतीतील वादाचे केंद्रस्थान
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २० : राज्याच्या राजकारणाचे केंद्र आता केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळे उल्हासनगर हे शहर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय वादाचा स्फोटक केंद्रबिंदू बनले आहे. ‘‘भाजप-शिवसेना शिंदे गटातील फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात उल्हासनगरातून झाली,’’ हे मुख्यमंत्र्यांचे विधान राज्यभरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.

राज्यात महायुती सत्तेत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला असून, उल्हासनगर शहर या तणावाचे प्रमुख केंद्र ठरले आहे. १३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी नगरसेविका मीना सोंडे, माजी नगरसेवक किशोर वनवारी या दोन प्रभावी नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे उल्हासनगर भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी टीम ओमी कलानीने भाजपला मोठा धक्का देत चार ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवकांना आपल्या गटात सामील केले. जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश मखिजा राम (चार्ली) पारवानी यांनी प्रवेश केला. हा प्रवेश टीओके मार्फत झाला असला तरी, या नेत्यांनी गळ्यात शिवसेनेचा (शिंदे गट) मफलर परिधान केला होता. तसेच या सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. यावरून या पक्षप्रवेशामागे शिंदे गटाचा मोठा प्रभाव स्पष्ट दिसत होता.

प्रतिहल्ला आणि तणाव वाढला
या धक्क्यांनंतर भाजपनेही प्रतिहल्ला करत कल्याण-डोंबिवलीसह इतर शहरांमधून शिंदे गटातील अनेक नेत्यांना पक्षात घेतले. यामुळे शिंदे गटात तणाव वाढला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अर्धी शिवसेना भाजपमध्ये घेणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. यामुळे शिंदे पिता-पुत्र कमालीचे अस्वस्थ झाले.

शिंदे गटाची तक्रार :
वाढत्या तणावाचा परिणाम म्हणून, शिंदे गटातील काही मंत्री मुंबईतील कॅबिनेट बैठकीस गैरहजर राहिले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन,‘‘भाजप युतीधर्म पाळत नाही,’’ अशी तक्रार केली. या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट आणि ठाम उत्तर दिले, “फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच उल्हासनगरातून केली. हे विधान जाहीर होताच, उल्हासनगर हे शहर राज्यातील महायुतीच्या वादाचा केंद्रबिंदू बनले.

तणाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न
स्फोटक वातावरणानंतर मुंबईत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक झाली. पुढील काळात दोन्ही पक्षांनी परस्परांची संमती घेतल्याशिवाय नेते-कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश थांबवावेत. महायुतीची प्रतिमा बिघडवणारे सर्व संघर्ष थांबवावेत, असे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उल्हासनगरमध्ये निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी, या आठवड्यातील घडामोडींमुळे हे शहर राजकारणातील सर्वात महत्त्वाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com