अवघ्या १९७ गावात ‘हर घर जल’

अवघ्या १९७ गावात ‘हर घर जल’

Published on

अवघ्या १९७ गावांत ‘हर घर जल’
ठाणे जिल्ह्यात ६३ हजार कुटुंबांना नळ जोडणीची प्रतीक्षा

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत मुबलक असलेल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. याची दखल घेऊन, ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत ७९१ गावांमध्ये कामे हाती घेण्यात आली. यातील ४७३ योजना पूर्ण झाल्या असून एक लाख ९७ हजार ४९८ कुटुंबांना घरगुती नळजोडणी देण्यात आली, असा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे; मात्र वास्तव वेगळे आहे. अजूनही ६३ हजार ७८४ कुटुंबीय आजही नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

मागील सात वर्षांत ७९१ पैकी अवघ्या १९७ गावांमध्येच ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आले. केंद्र सरकारच्या माध्यमातून २०१९ पासून ‘जलजीवन मिशन’ ही योजना राबविण्यात येत आहे. २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांना नळजोडणी देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १,१८० योजनांची कामे हाती घेण्यात आली असून, त्यासाठी ७७९ कोटींचा आराखडा तयार केला आहे. २०१९ मध्ये दोन लाख ३४ हजार ६१२ असलेल्या ग्रामीण कुटुंबांची संख्या वाढून सध्या दोन लाख ६१ हजार २७१ झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने एक लाख ९७ हजार ४९८ कुटुंबांना नळजोडणी दिल्याचा दावा केला असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत ३१,५८४ आणि जिल्हा परिषदअंतर्गत ३२,२०० असे एकूण ६३,७८४ कुटुंबीय आजही नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यामुळे सद्यःस्थितीत ठाणे जिल्ह्यातील केवळ १९७ गावेच ‘हर घर जल’ म्हणून घोषित करता आली आहेत.

विविध कारणांनी रखडली कामे
जलजीवन मिशनअंतर्गत योजना वेगाने राबविण्याच्या सूचना तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या; मात्र योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे.
योजनांचे उद्भव कोरडे जाणे, जागांचे वाद आणि जलवाहिनी टाकण्यास येणाऱ्या जागांच्या अडचणी, निधीची उपलब्धता आदी कारणांमुळे योजना रखडत आहे.

जागेचा तिढा
योजनेच्या कामांमध्ये वन विभाग आणि मालकी हक्काच्या जागांचा तिढा ही मोठी समस्या आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी १०४ जागांपैकी केवळ ८६ परवानग्या प्राप्त, उर्वरित १८ परवानग्या प्रलंबित आहेत. आवश्यक असलेल्या २९३ पैकी २१६ ठिकाणी मंजुरी प्राप्त, तर ७७ हरकती अजूनही प्रलंबित आहेत.

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई
जलजीवन मिशन योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ४४१ योजनांच्या कंत्राटदारांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

जलजीवनचा तालुकानिहाय आराखडा
तालुका योजनांची संख्या अंदाजित किंमत
अंबरनाथ ६१ ४४ लाख ७६ हजार
भिवंडी २०६ २ कोटी २९ लाख ९ हजार
कल्याण ५४ ३५ लाख ५२ हजार
मुरबाड २१९ १ कोटी ७७ लाख ६८ हजार
शहापूर २४७ २ कोटी ४५ लाख २५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com