बदलापूर पश्चिम बाजारपेठ रात्रीच्या वेळी अनधिकृत फेरीवालांच्या ताब्यात
बदलापुरात रात्री भरतो अनधिकृत फेरीवाल्यांचा बाजार
पोलिस, पालिकेचे दुर्लक्ष; रात्री साडेदहानंतर अवैध फेरीवाल्यांची गर्दी, वाहतूक कोंडीचा त्रास वाढला
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) ः बदलापूर पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठ रात्री साडेदहा वाजल्यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांच्या ताब्यात जाते. सुमारे शंभरहून अधिक हातगाड्या रस्त्यावर उभ्या राहिल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी तर निर्माण होतेच, सोबतच कचऱ्याचे ढीगही साचतात. याकडे पोलिस आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बदलापूर पश्चिमेतील मुख्य बाजारपेठेत रात्री साडेदहानंतर जवळपास शंभरहून अधिक फेरीवाले हातगाड्या रस्त्यावर उभ्या करून भाज्या, फळे आणि इतर किरकोळ वस्तू अतिशय कमी दरात विक्रीस ठेवतात. रात्री उशिरा लोकलने बदलापुरात पोहोचणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही ‘स्वस्त बाजारपेठ’ बनल्याने येथे मोठी गर्दी होत आहे. मात्र या गर्दीमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासोबतच फेरीवाल्यांच्या हातगाड्या चक्क मुख्य रस्त्यावर असल्याने चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. वाढलेली कोंडी आणि प्रशासनाचे डोळेझाक धोरण यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, पोलिस व पालिका प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी बदलापूरकरांची आग्रही मागणी आहे.
बाजारपेठेत अस्वच्छता
भाज्या, फळे आणि इतर किरकोळ वस्तूंच्या हातगाड्या रस्त्यावर उभ्या असतात. या फेरीवाल्यांमुळे बाजारपेठेत कचऱ्याचे ढिगारे साचत असून घाणीचे साम्रज्य निर्माण होते. यामुळे रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण होते. रात्रीच्या वेळी कोणतीही कारवाई होत नसल्याने फेरीवाले निर्धास्तपणे गर्दी करून मालविक्री करतात.
रात्रीच्या वेळी बाजारातून पायी ये-जा करणेही कठीण झाले आहे. फेरीवाले हातगाड्या रस्त्यावर घेऊन उभे असतात. रस्ता अडवल्याने वाहनचालकांना गाड्या चालवताना त्रास होतो. त्यात फुटपाथ आणि रस्ते दोन्ही या फेरीवाल्यांनी काबीज केल्याने पायी चालणाऱ्यांना धड जागाच मिळत नाही. रस्त्यावरून चालताना सुसाट धावणाऱ्या वाहनांची भीती घेऊन बाजारातून चालावे लागते. पालिकेने या फेरीवाल्यांवर अतिक्रमणाची कारवाई केली पाहिजे.
- मोनिका वाघरे, सामान्य नागरिक
वाहनचालकांना आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन आलेल्या तक्रारीनुसार अतिक्रमण नियंत्रण विभागाला कारवाईचे निर्देश दिले जातील. तातडीने या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

