कचरा विल्हेवाट प्रक्रियेसाठी पाच यंत्रे

कचरा विल्हेवाट प्रक्रियेसाठी पाच यंत्रे

Published on

विरार, ता. २५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात कचऱ्याचा प्रश्न सध्या गाजत आहे. कचराभूमीवर कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. त्याची विल्हेवाट लवकर लावण्यासाठी पालिकेने यंत्रणा सज्ज केली असून त्यासाठी आधुनिक यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेने पाच ट्रॉमल यंत्र लावून या प्रक्रियेला गती देत उर्वरित १० लाख टन कचरा सहा महिन्यांत नष्ट करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.

वसई-विरार शहरातून दिवसाला सुमारे आठशेहून अधिक टन कचरा गोळा करून कचराभूमीवर नेला जातो. शहराच्या वाढत्या अनधिकृत चाळींमुळे अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना त्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी पालिकेने सर्वाधिक कचरा टाकण्याची ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी विविध कलाकृती साकारून ते कमी करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहे.

याआधी कचरा विल्हेवाटीसाठी कोणताही प्रकल्प नसल्याने कचऱ्याचे ढीग साचून डोंगर तयार झाले होते. वर्षभरापूर्वी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचराभूमीवर बायोमायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. याठिकाणी ट्रॉमल यंत्रणेद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे.

सध्या दोन यंत्रे कार्यरत
सद्यस्थितीत विल्हेवाट प्रक्रियेसाठी दोन ट्रॉमल यंत्रे आहेत. कचऱ्याचा वाढत्या ढिगाऱ्यामुळे ती यंत्रे अपुरी पडत आहे. आता आणखीन नवीन पाच ट्रॉमल यंत्रे त्या ठिकाणी बसवून कचरा वर्गीकरण विल्हेवाट प्रक्रियेला गती दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

साडेचार लाख टन कचऱ्याची विल्हेवाट
आतापर्यंत कचराभूमीवर जवळपास १५ लाख टन कचरा पडून होता. दोन वर्षांत त्याची विल्हेवाट लावून जागा मोकळी करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट होते. काम सुरू होऊन पावणेदोन वर्षे उलटून गेली, तरी निम्मा कचराही नष्ट झाला नाही. अपुरे यंत्र व पावसाचे अडथळे यामुळे आतापर्यंत केवळ साडेचार लाख टन कचऱ्याची विल्हेवाट होऊ शकली आहे.

पावसामुळे प्रक्रिया बंद होती. आता कचरा विल्हेवाट प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय यंत्र वाढवून कचरा विल्हेवाट प्रक्रियेला गती दिली जाणार आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत उर्वरित कचरा नष्ट केला जाईल.
- अर्चना दिवे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com