कामवारी नदीला ''पिवळा रंग''

कामवारी नदीला ''पिवळा रंग''

Published on

कामवारी नदीला पिवळा रंग
डाइंग रसायनमुळे नदीचे पाणी विषारी; प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष
भिवंडी, ता. २६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातून वाहणाऱ्या कामवारी नदीचे पाणी गेल्या काही दिवसांपासून पिवळे झाले असून, परिसरातील डाइंग कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्यामुळे हे प्रदूषण वाढले आहे. अनेक वर्षांपासून होणाऱ्या या गंभीर प्रदूषणाकडे कल्याण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, महसूल विभाग आणि भिवंडी महापालिका यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचा आणि केवळ कागदी घोडे नाचवल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडण्यास बंदी असतानाही शेलार गावाजवळील डाइंग युनिट्सकडून राजरोसपणे हे दूषित पाणी कामवारी नदीत आणि पुढे खाडीत सोडले जात आहे. नागरिक आणि संस्थांनी गेल्या पाच वर्षांपासून अनेक कार्यालयांत तक्रारी करूनही गेल्या १० वर्षांत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

कल्याण येथील प्रदूषण नियंत्रण विभाग कार्यालय कायम दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. भिवंडी पालिकेने ‘चला नदीला समजून घेऊ या’ यासारखे उपक्रम राबवले खरे, पण पुढे कोणतीच कारवाई केली नाही. महसूल विभागाने केवळ कागदोपत्री कर्तव्यदक्षता दाखवली. नदीच्या पात्रात रसायन आणि गणपती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. उन्हाळ्यात या रसायनयुक्त गाळाची धूप होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे हवा आणि वातावरण प्रदूषित होत असून, नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

शेतीला आणि जनावरांना पिण्यायोग्य पाणी मिळावे, यासाठी कामवारी नदी आणि खाडी प्रदूषणमुक्त करावी, अशी तीव्र मागणी परिसरातील नागरिकांनी आणि ग्रामीण शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार आणि प्रदूषण नियंत्रण विभागाकडे केली आहे.

विसर्जनामुळे प्रदूषण
कामवारी नदीच्या पाण्यामध्ये दरवर्षी शहरातील हजारोंच्या संख्येने गणेशमूर्ती विसर्जन केल्या जात आहेत. त्यामुळे शहरालगतच्या नदीच्या पात्रात मोठ्या संख्येने गाळदेखील साचला आहे. तर खाडीतदेखील मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रदूषण वाढले आहे. या रसायनयुक्त गाळाची उन्हाळ्यात धूप होऊन परिसरात दुर्गंधी पसरून येथील हवा आणि वातावरण प्रदूषित होऊन नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

भिवंडीत ग्रामीण आणि शहराला जोडणाऱ्या कामवारी नदीमधील पाणी पिवळे का झाले आहे, याची आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतो. तसेच त्यामध्ये रासायनिक सांडपाणी जात असल्यास पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास कळविण्यात येईल. कामवारी नदीमधील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल
- अभिजित खोले, तहसीलदार, भिवंडी तालुका

भिवंडी महापालिका क्षेत्रास लागून कामवारी नदी आणि खाडीमधील पाणी वाहत आहे. शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन कामवारी नदीमध्ये केले जाते. परंतु रासायनिक सांडपाणी या पाण्यात टाकणाऱ्या डाइंग नदीच्या पलीकडील शेलार या महसूल क्षेत्रात आहेत. सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाने दिलेल्या निधीने साधने विकत आणून नदी आणि खाडीमधील घाण महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साफ केली होती. त्याप्रमाणे निधी उपलब्ध झाल्यास नदीची स्वच्छता करण्यात येईल.
- नीलेश संखे, विभागप्रमुख, प्रदूषण नियंत्रण विभाग, भिवंडी पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com