कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडांचे संवर्धन करण्यासाठी ठाणेकर पर्यावरण प्रेमीही पुढे आले

कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडांचे संवर्धन करण्यासाठी ठाणेकर पर्यावरण प्रेमीही पुढे आले

Published on

तपोवनसाठी ठाणेकर पर्यावरणप्रेमीही सरसावले
कुंभमेळ्यासाठी झाडांचा बळी नको; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) ः नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांची कुंभमेळ्यासाठी होणारी प्रस्तावित तोड तातडीने थांबवावी, अशी मागणी ठाण्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तपोवनातील वृक्षांवर कुऱ्हाडीचा घाव घालणे म्हणजे एकाच वेळी संतांची पावन भूमी आणि नाशिककरांच्या वृक्षरूपी आईवर घाव घालण्यासारखे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने साधुसंतांच्या या पावन भूमीवरील वृक्षाची छाया नष्ट करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
तपोवन परिसर नाशिकचे ‘हरित हृदय’ मानले जाते. सकाळच्या धावण्यापासून विद्यार्थ्यांच्या व्यायामापर्यंत, पक्ष्यांच्या घरट्यांपासून साधुसंतांच्या ध्यानधारणेपर्यंत, या झाडांनी शहराच्या जीवनशैलीला आधार दिला आहे. अनेक शतके उभ्या असलेल्या या वृक्षांच्या कापण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडताच नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
कुंभमेळा हा लाखो श्रद्धाळूंचा आध्यात्मिक उत्सव असला तरी, त्याच्या नियोजनासाठी निसर्गाच्या हानीचा मार्ग स्वीकारणे अयोग्य आहे. कुंभमेळा १२ वर्षांनी येतो, पण तोडलेली झाडे परत येत नाहीत. तपोवन नाशिकचा आत्मा आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हेच आजच्या महाराष्ट्राला शोभणारे निर्णय असतील, असे डॉ. प्रशांत सिनकर यांनी म्हटले आहे.

वृक्षतोडीला पर्याय उपलब्ध
या वृक्षतोडीला पर्यायी उपाय उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. स्टिल्ट/उंच बांधकाम, तात्पुरत्या संरचनांचे स्थलांतर, वापरात नसलेल्या शासकीय जमिनींचा पुनर्वापर, नदीकाठी पर्यावरणपूरक नियोजन अशा पर्यायांचा शासनाने विचार करावा, अशीही त्यांनी मागणी केली.

समाजमाध्यमांवर मोहीम
तपोवनातील झाडांच्या संरक्षणासाठी विविध पर्यावरणप्रेमी, नागरिक संघटना आणि स्थानिक रहिवासी पुढे येत आहेत. समाजमाध्यमावरही ‘तपोवन वाचवा’ या मोहिमेला वेग आला आहे. मुख्यमंत्र्याकडे पाठवलेल्या निवेदनानंतर आता पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.


तपोवनातील झाडांची तोड ही नाशिकच्या आत्म्यावरचा घाव आहे. कुंभमेळा महत्त्वाचा आहे, पण निसर्गाचा बळी कधीच स्वीकारार्ह नाही. झाडे वाचवण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा.
- डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com