राष्ट्रीय बाजार समिती कायद्याविरोधात एपीएमसी मार्केट बंद

राष्ट्रीय बाजार समिती कायद्याविरोधात एपीएमसी मार्केट बंद

Published on

मार्केट बंदला संमिश्र प्रतिसाद
राष्ट्रीय बाजार समिती कायद्याविरोधात आंदोलन
वाशी, ता. ५ (बातमीदार) ः नवीन राष्ट्रीय बाजार समिती कायद्याविरोधात व्यापारी वर्ग एकवटला आहे. शुक्रवारी (ता. ५) राज्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळला. धान्य मार्केटप्रमाणे मसाला मार्केट बंद करण्यात आले. तर जीवनावश्यक गोष्टी म्हणून फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट मात्र सुरू ठेवण्यात आले होते. मार्केट सुरू असले तरी व्यापाऱ्यांचा या बंदला पाठिंबा आहे, असे मत व्यापारीवर्गाने व्यक्त केले.
सद्यस्थितीत राज्यात बाजार समिती कायदा लागू आहे. त्या अनुषंगाने बाजार आवारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना विविध प्रकारचे कर, सेस बाजार समितीला द्यावे लागतात; मात्र व्यापार खुला केल्याने बाजार समिती आवाराबाहेर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर किंवा सेस भरावा लागत नाही. बाजार समितीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या नियमांचे पालन करत व्यापार करावा लागतो. खुला बाजार केल्यामुळे नियम पाळणाऱ्या बाजार समितीत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे बाजार समिती कायदा सर्वांसाठी समान असावा, अशी भूमिका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांची आहे.

१९६३ मधील जुना बाजार समिती कायदा, अन्न सुरक्षा कायदा, जीएसटी आणि एपीएमसी शुल्काच्या ओझ्याखाली व्यापारी वर्ग दबला जाणार आहे. त्यामुळे या समस्यांकडे राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजार समिती बंदचा निर्णय घेतला. हा कायदा रद्द करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे; मात्र व्यापाऱ्यांच्या मागणीकडे शासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. वर्षभरापूर्वी व्यापाऱ्यांनी याच मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे, असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले होते; मात्र यावर कोणताच निर्णय झाला नाही, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी सांगितले.
---
कांदा-बटाटा, फळ, भाजी मार्केट सुरू
जीवनावश्यक दैनंदिन गरजा भागवणारे, कांदा-बटाटा, फळभाजी मार्केट व्यापाऱ्यांनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. लोकांची कोंडी होऊ नये म्हणून हे मार्केट सुरू ठेवण्यात आले; मात्र आमचा बंदला पूर्णपणे पाठिंबा आहे, असे फळबाजार मार्केटमधले व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. आजच्या बंदला पाठिंबा देत धान्य आणि मसाला मार्केट मात्र व्यापाऱ्यांनी पूर्णपणे बंद ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com