रायगडमध्ये भात खरेदीला अल्प प्रतिसाद

रायगडमध्ये भात खरेदीला अल्प प्रतिसाद

Published on

रायगडमध्ये भातखरेदीला अल्प प्रतिसाद
आर्द्रतेच्या अडचणीमुळे चिंता; आतापर्यंत ३,९३० शेतकऱ्यांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : शेतकऱ्यांच्या मागणीनंतर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली असली तरी नोंदणी प्रक्रियेतील टप्प्यात खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. भातातील जास्त आर्द्रतेमुळे शेतकरी नाराज असून, त्याचा खरेदीवर प्रत्यक्ष परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३,९३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, खरेदी प्रक्रिया सोमवार (ता. ८) पासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
यंदाच्या हंगामात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन किती मिळेल आणि खरेदी किती होईल, याचा निश्चित अंदाज मार्केटिंग फेडरेशनलादेखील येत नाही. पावसामुळे पिकाची कापणी उशिरा झाली. आता थंडी वाढल्याने भात सुकवणे कठीण होत आहे. परिणामी भातातील आर्द्रतेचे प्रमाण १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे प्रमाण शासनाने ठरवलेल्या निकषांपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांना भातविक्री करण्यात अडथळे येत आहेत. शासनाच्या किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) भात खरेदीसाठी जिल्ह्यातील विविध संस्थांना केंद्रे चालवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे मोठे आव्हान ठरत आहे. आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक करण्याची केवायसी प्रक्रिया अनेकांनी पूर्ण केलेली नसल्याने नोंदणी आणि विक्री दोन्हींमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. यंदा सुमारे ८० टक्के भात पावसाने भिजलेला असल्याने तो व्यवस्थित सुकवता आलेला नाही. त्यामुळे शेतात भात असला तरी तो पात्रतेच्या निकषांनुसार विकता न आल्याने शेतकरी हताश झाले आहेत. खरेदीसाठी केंद्रे सुरू असली तरी शेतकरी हातातील भात विकू शकत नाही, हीच सर्वात मोठी अडचण असल्याचे सांगितले जात आहे.
----
दोन दिवसांत रक्कम जमा होणार
मागील खरीप हंगामात पाच लाख ३० हजार क्विंटल भात खरेदी केली जाते. यंदा ही सरासरी खरेदी गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील भातखरेदी केंद्रे सोमवारपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. भातखरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन दिवसांत खरेदीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील दोन दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. धान्याचा दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यास आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिद्धी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान खरेदी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पणन (मार्केटिंग) के. बी. ताटे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com