रात्रशाळांसाठी 2022 नंतर आलेले धोरण ठरले घातक

रात्रशाळांसाठी 2022 नंतर आलेले धोरण ठरले घातक

Published on

रात्रशाळांसाठी २०२२चे धोरण घातक
शिकवणीचे तास कमी केल्याने निकालावर परिणाम

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : शालेय शिक्षण विभागाने मुंबईसह राज्यातील रात्रशाळांच्या गुणवत्तेसाठी १७ मे २०१७ला आणलेले धोरण काही राजकीय संघटनांनी मोडीत काढले. तसेच तत्कालीन सरकार संकटात सापडले असताना ३० जून २०२२ रोजी रात्रशाळांसाठी नवे धोरण आणण्यात आले. हे धोरणच राज्यातील रात्रशाळांसाठी घातक ठरले. असंख्य रात्रशाळा शेवटची घटका मोजत असून, या धोरणाच्या आडून दुबार नोकरी करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मात्र गब्बर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबईसह राज्यातील रात्रशाळांचा एकूण ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिलेल्या प्रस्तावानंतर आणि विधान परिषदेत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर रात्रशाळांसाठी ३० जून २०२२ला धोरण आणण्यात आले. त्यात सकाळी सरकारी, अनुदानित शाळांवर नोकरी करणाऱ्या शिक्षकांना दुबार नोकरी करण्यापासून चाप लागला. यातून बेरोजगार असलेल्या असंख्य तरुणांना अर्धवेळ शिक्षकांची नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली होती तसेच रात्रशाळांच्या वेळा साडेतीन तासांपर्यंत होत्या; मात्र तत्कालीन उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणी सापडले असताना त्याच काळात काहींनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून १७ मे २०१७ रोजीचे नवीन धोरण रद्द करून त्याऐवजी ३० जून २०२२ला रात्रशाळांसाठी असंदिग्ध असे धोरण आणले गेले. यामुळे रात्रशाळांचे प्रचंड मोठे शैक्षणिक नुकसान झाले असल्याचे मुंबईतील शिक्षक परिषदेचे रात्रशाळांचे प्रतिनिधी व मॉडर्न नाइट स्कूलचे मुख्याध्यापक निरंजन गिरी यांनी सांगितले.


असा झाला परिणाम
३० जून २०२२च्या धोरणामुळे रात्रशाळांच्या शैक्षणिक तासांच्या वेळा घटल्या. पूर्वी साडेतीन तास शाळेची वेळ अडीच तासांवर आणण्यात आली. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठे परिणाम झाले. तास कमी झाल्याने शिकवण्यावर त्याचे परिणाम झाले व विद्यार्थ्यांचे निकाल घटले.


दुबार शिक्षक गब्बर, विद्यार्थी वाऱ्यावर
सकाळी अनुदानित शाळेवर आणि सायंकाळी रात्रशाळांमध्ये दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षकांमुळे रात्रशाळांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटल्याचे मुख्याध्यापक निरंजन गिरी सांगतात. तर सकाळी पूर्णवेळ आणि रात्री अर्धवेळ सरकारी वेतन घेऊन काही शिक्षक गब्बर झाले, मात्र त्यातून विद्यार्थ्यांचे फार हित साधले गेले नाही. उलट रात्रशाळांमध्ये पटसंख्या घटल्याचे रात्रशाळेतील मुख्याध्यापक संतोष कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com