पाणी टंचाईने टँकरच्या फेऱ्यांत वाढ

पाणी टंचाईने टँकरच्या फेऱ्यांत वाढ

Published on

पाणीटंचाईने टँकरच्या फेऱ्यांत वाढ
तीन दिवसांत २०१ टँकरने पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे जलशुद्धीकरण केंद्राकडून येणारी मुख्य जलवाहिनी तुटल्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून शहराला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी ठाणे पालिकेने झोनिंग पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन केले असले तरी, मागील तीन दिवसांत टँकरच्या तब्बल २०१ फेऱ्या झाल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे शहराची सुमारे २७ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहराला दररोज ६२१ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त ५८५ दशलक्ष लिटर पाणीच उपलब्ध होते. लोकसंख्या वाढ आणि नवीन वसाहतींमुळे शहरावर पाण्याची समस्या कायम असून, वाढीव पाणी मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीकडून पाणी घेणाऱ्या दिवा भागातही पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. अशातच, शनिवारी (ता. ६) सकाळी कल्याण फाटा परिसरातील महानगर गॅसच्या कामादरम्यान एक हजार मिमी व्यासाच्या या जलवाहिनीला मोठी हानी पोहोचली. त्यामुळे पिसे बंधाऱ्यातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे येणारी मुख्य जलवाहिनी तुटल्याने ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. या पाइपलाइन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात आली आहे.
दरम्यान, ठाणे पालिकेकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली असून, यामुळे एरवी आठ ते दहा फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यानुसार मागील तीन दिवसांत म्हणजे रविवार, सोमवार आणि मंगळवारी टँकरच्या २०१ फेऱ्या झाल्या असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. नवीन भाग जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बुधवारी (ता. १०) सायंकाळपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असा विश्वास पालिकेचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी व्यक्त केला आहे.

गृहसंकुलांमध्ये टंचाईची समस्या
ठाणे पालिकेच्या स्वत:च्या योजनेतून आणि स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा ठाणे शहर, घोडबंदर, वर्तकनगर, वागळे इस्टेट, सिद्धेश्वर तलाव, कळवा आणि मुंब्रा भागात करण्यात येतो, परंतु महापालिकेच्या योजनेतील पाणीपुरवठ्यात कपात झाल्याने या ठिकाणी आता विभागवार पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या भागांना दोनऐवजी एकवेळच पाणी दिले जात आहे. तेही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अनेक गृहसंकुलांमध्ये टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

कधी किती टँकर
वार टँकरसंख्या
रविवार ४३
सोमवार ७४
मंगळवार ८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com