महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ग्रामीण विकासात हातभार

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ग्रामीण विकासात हातभार

Published on

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ग्रामीण विकासात हातभार
जिल्हा प्रशासन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सामंजस्य करार

पालघर, ता. १३ (बातमीदार) : अनुसूचित जमातींसह समाजातील वंचित घटकांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण आणि शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदि कर्मयोगी अभियान’अंतर्गत आदि कर्मयोगी फेलोशिपच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. पालघर जिल्हा प्रशासन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्यात ‘आदि कर्मयोगी फेलोशिप’ राबविण्यासाठी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामंजस्य करार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या या बैठकीत पालघर येथील दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किरण सावे उपस्थित होते. उपक्रमाद्वारे गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी, योजनांची देखरेख आणि समुदाय सहभाग वाढवण्याला नवी दिशा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळणार असून ग्रामीण विकास व अर्थशास्त्रासह सामाजिक विज्ञानाचे उत्साही विद्यार्थी या फेलोशिपचा भाग होणार आहेत. गावातील आजीविका वृद्धी, आर्थिक स्वावलंबन, योजना अंमलबजावणीची गुणवत्ता आणि समुदाय सहभाग वाढविण्याच्या प्रक्रियेत ते थेट योगदान देतील. प्रकल्प कार्यालय जव्हार व डहाणू, महिला व बालविकास, कृषी, आरोग्य, वन विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांचेही सहकार्य या कार्यक्रमास राहणार असल्याचे डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com