मुख्यमंत्र्यांनी अंत पाहू नये; अन्यथा भारताचा नेपाळ होईल

मुख्यमंत्र्यांनी अंत पाहू नये; अन्यथा भारताचा नेपाळ होईल

Published on

मुख्यमंत्र्यांनी अंत पाहू नये
दि. बा. पाटील विमानतळ नामांतराबाबत आगरी महोत्सवातून निर्वाणीचा इशारा
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याबाबतची घोषणा होत नसल्यामुळे आगरी महोत्सवातून केंद्र व राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. विमानतळाला दिबांचे नाव देणार असल्याची १०१ टक्के खात्री आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांचा अंत न पाहता २५ तारखेआधी नावाची घोषणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशी घोषणा दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी केली. तर दिबांचे नाव विमानतळाला न दिल्यास महाराष्ट्रात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिला.
अखिल भारतीय आगरी महोत्सवात लोकनेते दि. बा. पाटील साहेब-एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व या विषयावर शनिवारी (ता. १४) परिसंवाद पार पडला. या परिसंवादात दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, आगरी समाजाचे नेते जे. डी. तांडेल, महोत्सवाचे अध्यक्ष शरद पाटील, गुलाब वझे, विजय गायकर, डी. बी. पाटील, मुकेश कांबळे सहभागी झाले होते.
दि. बा. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या संघर्षमय जीवनातील अनेक पैलूंवर परिसंवादात चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांचा आवाज सरकार दरबारी यशस्वीपणे पोहचविण्यात दिबांचे महत्वाचे योगदान होते. दिबा नसते, तर प्रकल्पग्रस्तांना कधीही न्याय मिळाला नसता, असे नमूद करीत दिबांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा मुद्द्याबाबत प्रश्न विचारल्यावर अतुल पाटील यांनी नामांतराबाबत आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा दिला. आगरी-कोळी समाजाला संघर्षाशिवाय काहीही मिळाले नाही. विमानतळाच्या नावासाठीही भूमिपूत्रांना संघर्ष करावा लागत आहे. दिबांचे नाव विमानतळाला दिले जाणार असल्याची माझी १०१ टक्के खात्री आहे. पण आता दिरंगाई होत आहे. विमानतळाला नाव देण्याबाबत २५ डिसेंबरआधी घोषणा न झाल्यास, आंदोलन करू, अशी घोषणा अतुल पाटील यांनी केली.

महाराष्ट्रात नेपाळसारखे आंदोलन
दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र व राज्य सरकार असे का वागत आहे, हे कळत नाही, असा सवाल आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी केला. तसेच विमानतळाला अन्य कोणाचे नाव दिल्यास महाराष्ट्रात नेपाळसारखे आंदोलन उभे राहील. सरकारने महाराष्ट्राचा नेपाळ होऊ देऊ नये, असा खणखणीत इशारा गुलाब वझे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com