कृषीच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून गिरवले शेतमाल प्रक्रियेचे धडे
कृषीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले शेतमाल प्रक्रियेचे धडे
उद्योगांना मिळणार चालना
वाणगाव, ता. १५ (बातमीदार) : शेतमालावर योग्य प्रक्रिया करून आर्थिक बाजू बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून शेतमाल प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण धडे गिरवले. पालघर जिल्ह्यात शेतीपूरक उद्योगांना मोठा वाव असल्याने, विद्यार्थ्यांनी स्थानिक स्तरावर उपलब्ध फळांवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार केले. ‘‘शेतमालावर प्रक्रिया करणे म्हणजे केवळ शेती करणे नव्हे, तर त्यातून अधिक मूल्य निर्माण करून आर्थिक बाजू बळकट करण्यासारखे आहे. या प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्यास चालना मिळेल,’’ असे विद्यालयाच्या प्राचार्या सोनालिका पाटील यांनी सांगितले आहे.
फळे आणि दुधापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ
या विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या चिकूसह इतर फळांवर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवले. आंबा, लिंबू, मिरची यांपासून लोणचे; टोमॅटोपासून सॉस, केचप; आवळ्यापासून आवळा कॅण्डी व ज्यूस; तसेच सर्व फळांचे ज्यूस आणि स्कॅश, आले-लसूण पेस्ट, विविध प्रकारचे पापड तर दुग्धजन्य पदार्थ दुधापासून खवा, चक्का, दही, ताक, श्रीखंड यांचा समावेश आहे. यादरम्यान, आदिवासी विद्यार्थिनींचा शेतमाल प्रक्रियेकडे विशेष ओढा दिसून आला.
यासाठी कृषी विद्यालयाचे प्रा. दिलीप पवार, प्रा. प्रवीण भोये, प्रा. निशांत कासट, श्रद्धा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
------------------
प्रक्रिया उद्योगातून ग्रामीण विकास
प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी शेतमाल प्रक्रियेचे महत्त्व समजून घेतले. कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनाची किंमत वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. यामुळे ग्रामीण भागात, विशेषतः महिलांसाठी, नवीन रोजगार संधी निर्माण होतात. नाशवंत मालावर प्रक्रिया केल्याने साठवणूक आणि वाहतूक सोपी होऊन बाजारपेठ वाढण्यास मदत होते.
------------------
शासनाच्या १०० टक्के नोकऱ्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे ज्ञान प्रात्यक्षिकातून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक परिसरातील फळे, भाजीपाला व शेतमालावर आधारित प्रक्रिया उत्पादने निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवसायात उभारी घेणे शक्य होणार आहे.
- सोनालिका पाटील, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव
------------------
शेतमाल प्रक्रियेचे तंत्रज्ञान आत्मसात झाल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावातील महिलांना एकत्रित करून बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित करणार आहे.
- पौर्णिमा जाधव, विद्यार्थिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

