टाटा जलविद्युत प्रकल्पामुळे पर्यावरणाची चिंता

टाटा जलविद्युत प्रकल्पामुळे पर्यावरणाची चिंता

Published on

टाटा जलविद्युत प्रकल्पामुळे पर्यावरणाची चिंता
टाटा पॉवरने आश्वासने पूर्ण केली नाहीत; १७ डिसेंबरपासून राष्ट्रवादीचे आमरण उपोषण
कर्जत, ता. १६ (बातमीदार) : कर्जत तालुका येथील भिवपुरी परिसरात टाटा पॉवर कंपनीकडून भिवपुरी ऑफ-स्ट्रीम ओपन-लूप पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. टाटा समूहाच्या शंभर वर्षे जुन्या जलविद्युत प्रकल्पाचा हा ‘फेज टू’ असून, यामध्ये पाण्याचा विसर्ग न करता पाणी खाली साठवून ते पुन्हा वर नेऊन वीजनिर्मिती करण्याची संकल्पना राबवली जात आहे. सुमारे १००० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली आहे.
ऊर्जानिर्मिती वाढणार असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी या प्रकल्पामुळे पर्यावरणीय हानी होण्याची तीव्र भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून टाटा प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पेज नदी बारमाही वाहत असून, त्यामुळे कर्जत तालुक्याचा नैसर्गिक समतोल टिकून आहे, मात्र जुना प्रकल्प बंद झाल्यास किंवा पाण्याचा विसर्ग थांबल्यास कर्जत तालुक्यातील निसर्ग, शेती आणि जलस्रोतांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. टाटा पॉवरने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्या नेतृत्वाखाली, १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून टाटा पॉवर प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रकल्पाच्या कामासाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील ब्लास्टिंगमुळे तापकीरवाडी व धनगरवाडा येथील अनेक घरांना तडे गेल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. खोदकामामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे माकडांचा त्रास वाढला असून, शेती, फळझाडे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

चौकट
प्रमुख मागण्या
- तापकीरवाडी व धनगरवाडा गावांचे तातडीने पुनर्वसन
- ब्लास्टिंगमुळे नुकसान झालेल्या घरांची भरपाई
- पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र फिल्टर प्लांट
- वृक्षतोड व पर्यावरणीय नुकसानीची भरपाई
- स्थानिक नागरिकांना पात्रतेनुसार रोजगार
- शेती व जमिनीच्या नुकसानीसाठी योग्य मोबदला

कोट
स्थानिक नागरिकांवर टाटा कंपनीकडून सातत्याने अन्याय होत आहे. अनेक वेळा ग्रामस्थांनी उपोषण करून आपल्या मागण्या मांडल्या; मात्र प्रत्येक वेळी त्यांची फसवणूकच झाली. स्थानिकांच्या हक्कांसाठी मी स्वतः आणि माझे सहकारी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत. जोपर्यंत नागरिकांच्या हक्कांचे ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही.
- सुधाकर घारे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
तथा माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com