शाहू नगर वसाहतीत गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी

शाहू नगर वसाहतीत गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी

Published on

शाहूनगर वसाहतीत गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी
नागरिक त्रस्त; वारंवार तक्रारी करूनही पालिकेचे दुर्लक्ष
धारावी, ता. १८ (बातमीदार) ः धारावीतील शाहूनगर वसाहतीत बृहन्मुंबई महापालिकेकडून पुरवठा होणारे पिण्याचे पाणी गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ व दुर्गंधीयुक्त येत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात रहिवाशांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वसाहतीत पोटाचे विकार वाढीस लागले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. पाणी गाळून घेणे किंवा उकळून वापरले तरीही त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. नळाला पाणी आले की तीव्र वास येत असल्याने तेथे उभे राहणेही कठीण होते. धारावीत पाण्याची समस्या नेमकी कधी सुटणार, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वसाहतीत वेळेवर पाणीपुरवठा होत नाही आणि त्यातच दूषित व गढूळ पाणी येत असल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी राजर्षी शाहूनगर म्युनिसिपल बिल्डिंग्स संघाचे पदाधिकारी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. संघाचे अध्यक्ष भरत राऊळ, सरचिटणीस मनोज शिंदे, सहचिटणीस लक्ष्मण फणसगावकर, खजिनदार प्रफुल्ल घोलप, तसेच क्रियाशील सदस्य अरुण भंडारे हे पालिकेसोबत चिकाटीने पाठपुरावा करत असले, तरी समस्या सुटत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तक्रार केल्यानंतर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वसाहतीत येऊन पाहणी करतात; मात्र प्रत्यक्षात समस्या सोडवली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शाहूनगर वसाहतीतील नागरिकांकडून होत आहे.

शाहूनगर वसाहतीतील पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहोत, तरीही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
- अरुण निवृत्ती भंडारे, स्थानिक रहिवासी

लवकरच दुरुस्‍ती
यासंदर्भात पालिकेच्या ग/उत्तर प्रभागाचे सहाय्यक अभियंता कैलास धोंडगे यांनी सांगितले, की मुख्य जलवाहिनीतून पालिकेच्या मुख्य टाकीत जाणारे पाणी स्वच्छ आहे. टाकीतून वसाहतीतील इमारतींना पाणीपुरवठा केला जातो. त्यातील एक-दोन इमारतींच्या अंतर्गत जलवाहिनीत बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून तो लवकरच दुरुस्त करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com