रुंदीकरणासाठी पालिकेकडून पहाटे मोजमाप
रुंदीकरणासाठी पालिकेकडून पहाटे मोजमाप
भिवंडीकरांचा तीव्र विरोध; प्रशासनाकडून सारवासारवी
भिवंडी, ता. २० (वार्ताहर) : भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पहाटेच कारवाई केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. नागरिक गाढ झोपेत असताना, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात पहाटे चार वाजता कल्याण नाका ते टेमघर दरम्यानच्या कल्याण रोडवर ३६ मीटर रुंदीचे मोजमाप व मार्किंग सुरू केल्याने स्थानिक नागरिक व बाधित मालमत्ताधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेने मागील महिन्यात अंजूरफाटा ते कल्याण रोड या मार्गाचे रुंदीकरण सुरू केले असून, पुढील टप्प्यात कल्याण नाका ते टेमघर हा रस्ता रुंद करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. मात्र या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला येथील स्थानिक नागरिक, दुकानदार व मालमत्ताधारकांचा सुरुवातीपासूनच कडाडून विरोध आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटेच्या सुमारास मोजणी व मार्किंग केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे शंभर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पहाटे सुरू असलेल्या मोजमापाची माहिती मिळताच बाधित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व या मोजणीस तीव्र विरोध दर्शविला. संघर्ष समितीचे पदाधिकारी शादाब उस्मानी, राम लहारे, दीन मोहम्मद यांच्यासह माजी आमदार रुपेश म्हात्रे हेही कल्याण नाका परिसरात दाखल झाले. त्यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारत या कारवाईचा निषेध केला. या घडामोडींमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त विजय मराठे हे अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नागरिकांची समजूत काढत वातावरण शांत केले. मात्र तोपर्यंत रस्त्यावरील बहुतांश मोजमाप व मार्किंगचे काम पूर्ण झाले होते.
......................
संघर्ष समितीचे पदाधिकारी राम लहारे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, सकाळी चार वाजता रहिवाशी झोपलेले असताना पालिका जागी होते. मालमत्ताधारक उपस्थित नसताना बेकायदा मार्किंग करण्यात येत आहे. प्रारूप विकास आराखड्यानुसार मार्किंग करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. आमचा या रस्ता रुंदीकरणाला विरोध कायम राहील, असे त्यांनी सांगितले. तर
याबाबत खुलासा करताना महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे बंदोबस्त उपलब्ध असताना पहाटे मोजणी करण्यात आली. नागरिकांना अंधारात ठेवून कोणतीही कारवाई केली जाणार नसून, पुढील टप्प्यात सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून कायदेशीर नोटीस बजावली जाईल व त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

