राजनाला कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण करा
राजनाला कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण करा
हेदवली-मांडवणे-कराळेवाडीतील शेतकऱ्यांची मागणी
कर्जत, ता. २३ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या टाटा पावर जलविद्युत प्रकल्पाच्या मार्गावरील पेज ही बारमाही नदी असून, या नदीतील पाण्याचा उपयोग पाटबंधारे विभागामार्फत राजनाला कालवा प्रकल्पातून परिसरातील शेतीसाठी केला जातो. दरवर्षी साधारण डिसेंबरमध्ये डावा, उजवा तसेच पाली-पोटल या तीन कालव्यांतून पाणी सोडले जाते. या पाण्यावर तब्बल ४५ गावांतील शेतकरी दुबार शेती करतात. मात्र, यावर्षी राजनाला कालव्यावरील अपूर्ण कामांमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कामे पूर्ण केल्याशिवाय पाणी सोडू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
राजनाला कालवा प्रकल्पाची सुरुवात १९५९ रोजी झाली असून, या प्रकल्पातून सुमारे दोन हजार ५४२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यातही शेती ओलिताखाली येऊन भात, भाजीपाला, कडधान्य यासारखी विविध पिके घेणे शक्य होते. मात्र, या कालव्यावरील उजवा कालवा कराळेवाडी, मांडवणे व हेदवली परिसरात अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असल्याने पाणी पूर्ण क्षमतेने पुढे जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. हेदवली येथील कालवा मार्गावरील मोरी फुटलेली असून, ती नव्याने टाकण्याची गरज आहे. तसेच मांडवणे येथील चाफेच्या नाल्यावरील मोरीही फुटलेली आहे. या ठिकाणी ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात सिमेंटच्या पिशव्या टाकून काम केले असून, याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. याशिवाय मोरीपासून अशोक धुळे यांच्या घरापर्यंत नाल्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. तसेच शिवाजी गायकर, हरिश्चंद्र म्हसकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक ठिकाणी मोरी टाकून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. काही शेतजमिनींच्या बाजूला खोल नाले खणण्यात आल्याने ये-जा करणे कठीण झाले असून, त्या ठिकाणीही मोऱ्या टाकणे अत्यावश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
................
पाटबंधारे विभागाला निवेदन
या सर्व मागण्यांबाबत ग्रामस्थ मंडळ हेदवली व परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला लेखी निवेदन दिले आहे. यावर्षी सर्व अपूर्ण कामे पूर्ण करूनच पुढील वर्षी १ डिसेंबर २०२६ रोजी राजनाला कालव्याचे पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. उशीर झाला तरी चालेल, मात्र काम पूर्ण झाल्यावरच सुरक्षित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, अशी एकमुखी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

