भविष्यातील गैरप्रकारांना आळा बसणार
भिवंडी, ता. २३ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका क्षेत्र हे अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या समस्येसाठी ओळखले जाते. अनेक वेळा या अनधिकृत बांधकामांमध्ये लोकप्रतिनिधींचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आरोप होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, सार्वत्रिक महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारांना अनधिकृत बांधकाम केलेले नाही, तसेच भविष्यातही करणार नाही, असे शपथपत्र सादर करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे.
महापालिका निवडणुकीनंतर अनेक नगरसेवकांचा व्यवसाय बांधकाम क्षेत्राशी संबंधित होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे पदावर निवडून आल्यानंतरही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्याचे किंवा स्वतः सहभागी होण्याचे प्रकार घडत होते. नव्या अटीमुळे आता निवडून येणाऱ्या नगरसेवकांना बांधकाम व्यवसाय करताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या उमेदवारी अर्जातील अटीनुसार उमेदवाराने; तसेच मुंबई महापालिका अधिनियमामधील तरतुदींचे वाचन करून महापालिका सदस्य निवडून येण्यासाठी अपात्र नसल्याचे जाहीर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने स्वतः, पत्नी किंवा पती; तसेच अवलंबित कुटुंबीयांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. निवडून आल्यानंतर उमेदवाराने अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यास तो नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरेल, असे शपथपत्रात नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्जासोबत हे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक केल्यामुळे भविष्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करणे प्रशासनाला अधिक सुलभ होणार आहे. या निर्णयामुळे पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

