सुरेश रेवणकर यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
सुरेश रेवणकर यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : घाटकोपर येथील ‘चालती-फिरती रक्तपेढी’ म्हणून ओळखले जाणारे सुरेश रेवणकर यांनी मरणोत्तर संपूर्ण अवयवदान व देहदान करण्याचा संकल्प केला आहे. मृत्यूनंतर शरीर जळून राख होण्यापेक्षा त्याचे अवयव गरजूंना उपयोगी पडावेत, या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तरुणांनीही देहदान व अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदानास सुरुवात करणाऱ्या रेवणकर यांनी आजवर तब्बल ११२ वेळा रक्तदान आणि ५६ वेळा पांढऱ्या पेशी दान केल्या आहेत. त्यामुळे त्यांची ओळख ‘चालती-फिरती रक्तपेढी’ म्हणून केली जाते. रक्तदानाच्या कार्यातून घाटकोपर व मुंबईचे नाव देशभर पोहोचवणाऱ्या रेवणकर यांची भारतातील प्रत्येक राज्यात रक्तदान करण्याची इच्छा असून, त्यांनी अनेक राज्यांमध्ये प्रत्यक्ष रक्तदान केले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांना शेकडो प्रमाणपत्रे व अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

