मुंबईत प्रचाराचा ना धुरळा, ना आरोपांच्या फैरी!

मुंबईत प्रचाराचा ना धुरळा, ना आरोपांच्या फैरी!

Published on

मुंबईत प्रचाराचा ना धुरळा, ना आरोपांच्या फैरी!
काय चाललंय मतदारांच्या मनात?
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचा धुरळा उडताना दिसत नाही. या वेळी युती आणि आघाडीत बिघाडी झाली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघेल, आरोप-प्रत्यारोपाला धार चढेल, अशी सर्वांची अपेक्षा होती; मात्र प्रचार शांतपणाने सुरू आहे. मुंबईकर, विशेषत: मराठी माणूस शांत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे कळायला मार्ग नाही.

लातूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई या महापालिकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्या तुलनेत मुंबई शांत असून काँग्रेस, भाजपसह मुख्य पक्षांनी केंद्रीय नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवलेली नाही. ठाकरे बंधू शांतपणे शाखाशाखांना भेटी देत आहेत. राज ठाकरेंची मुलखमैदानी तोफ अजून धडधडताना दिसत नाही. गुजराती विरुद्ध मराठी किंवा परप्रांतीय विरुद्ध मराठी अशा वादग्रस्त मुद्द्यांची राळ उठलेली नाही. मुख्य राजकीय पक्षांचे नेमके काय सुरू आहे, त्यामागचे नियोजन काय आहे, हे समजून घेऊया.

भाजप
हैदराबाद महापालिका निवडणूक पॅटर्नप्रमाणे या वेळी मुंबईत पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांसह भाजपचे सर्व केंद्रीय नेते उतरणार, असे सर्वांना वाटले हाेते. या वेळी इतर राज्यांतील काही आमदार आणि खासदार वगळता इतर मोठे नेते, चेहरे प्रचारात उतरले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सुरू आहेत. १२ तारखेला शिवाजी पार्कमध्ये महायुतीची एकमात्र मोठी सभा आहे.
रणनीती :
मोठ्या संख्येत केंद्रीय नेते मुंबईत प्रचारात उतरल्यास मुंबई तोडण्याच्या तसेच मराठी माणसाच्या ठाकरे बंधूंच्या मुद्द्याला हवा मिळू शकते. हे टाळायचे आहे.

काँग्रेस
उद्धव ठाकरे यांनी मनसेला सोबत घेतल्यामुळे आघाडी तोडली. आता काँग्रेसने या वेळी वंचितला सोबत घेतले आहे. स्थानिक नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राहुल, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे मोठे चेहरे प्रचारापासून अलिप्त आहेत.
रणनीती :
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी तुटली असली तरी भाजपला फायदा होऊ नये हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गांधी कुटुंबाला मैदानात उतरवून ठाकरे बंधूंवरचा फोकस हलू न देणे हे यामागील धाेरण आहे.

ठाकरे बंधू
मोठमाेठ्या जाहीर सभांऐवजी शाखा भेटींवर ठाकरे बंधूंचा जोर आहे. मुंबईतील २२७ शाखा आणि प्रचार कार्यालयांना राज, उद्धव ठाकरे, अमित तसेच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे भेटी देत आहेत. रविवारी शिवाजी पार्क येथे एकच जाहीर सभा हाेणार आहे.

रणनीती :
मोठ्या सभा घेऊन वेळ, संसाधन, ताकद खर्च करण्यापेक्षा शाखा भेटी करून कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन यंत्रणा कामी लावणे.

शिवसेना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपासून प्रचार सभा घेत आहेत. याशिवाय नीलेश राणे यांच्यासह मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांशी डोअर-टू-डोअर संपर्क साधत आहेत.
रणनीती :
माजी नगरसेवकांच्या वॉर्डांवर फोकस
...
लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणे मुंबई पालिकेच्या निवडणुकीत कुठलाच मुद्दा केंद्रस्थानी नाही. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे तिथे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे सर्वच पक्ष शांतपणे निवडणुका लढवताना दिसत आहेत. कुणीही कुठली जाेखीम घ्यायला तयार नाही. मतदारांच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागताना दिसत नाही.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com