

‘अष्टलक्ष्मी’ ईशान्य भारताकडे पाहण्याची नवी दृष्टी
जयवंत कोंडविलकर यांचे सूचक विचार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः ईशान्य भारत हा केवळ सीमावर्ती प्रदेश नसून तो भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय शक्तीचा अविभाज्य भाग आहे, अशी सूचक आणि व्यापक भूमिका पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे प्रणेते जयवंत कोंडविलकर यांनी स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत मांडली. ईशान्य भारताकडे ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून मर्यादित न पाहता ‘सप्तलक्ष्मी’ किंवा सिक्कीमसह ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवारी (ता. १२) पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे प्रणेते जयवंत कोंडविलकर यांनी धुमसता ईशान्य भारत या विषयावर प्रभावी शब्दांत गुंफले. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी, उपाध्यक्षा डॉ. सरोज कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते कोंडविलकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
मने जिंकून देश जोडणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे, असे सांगत त्यांनी समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने परिस्थिती कितीही कठीण असली तरी न थकता, न डगमगता कार्यरत राहावे, असा संदेश दिला. वैयक्तिक अनुभवांच्या आधारे त्यांनी ईशान्य भारतातील नागरिकांचा आपल्यावरील विश्वास, संघर्षमय प्रसंग आणि त्यातून मिळालेली प्रेरणा यांचा उल्लेख करत श्रोत्यांना भावनिक केले.
ईशान्य भारतातील दुर्गम भागात सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये केवळ शिक्षण नव्हे तर देशाबद्दल आत्मीयता निर्माण करणे हा या शाळांचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातूनच भविष्यात देशाला जोडणारी पिढी घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमांसाठी समाजाने अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या व्याख्यानमालेला संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, पालक, महाविद्यालयांच्या प्राचार्या, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
भावनिक नाते जोडणे आवश्यक
देशातील एकात्मता टिकवायची असेल तर सीमावर्ती भागांतील नागरिकांशी भावनिक नाते जोडणे आवश्यक असल्याचे सांगत कोंडविलकर यांनी स्पष्ट केले की, परदेशी अर्थसाहाय्याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या देशविरोधी प्रवृत्ती रोखण्यासाठी शिक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, आपुलकी आणि विश्वास निर्माण झाला तर कोणतीही विघातक शक्ती यशस्वी होऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.