प्रचार थंडावणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नवी मुंबई आणि पनवेल महापालिका निवडणुकीकरिता गुरुवारी (ता. १५) मतदान होणार आहे. त्याकरिता उद्या (ता. १३) संध्याकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना सोमवारी (ता. १२) आणि मंगळवार (ता. १३)चा दिवस घरोघरी जाऊन भेटीगाठीचा राहणार आहे. त्यानिमित्ताने नवी मुंबईत ऐरोलीमध्ये भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे सोमवारी आयोजन केले होते, तर पनवेलमध्ये कळंबोली येथे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते.
गेले दहा दिवस सुरू असलेला प्रचार अखेर उद्या थांबणार आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे महायुतीमधील दोन्ही महत्त्वाचे पक्ष वेगवेगळी निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीतही बिघाडी झाली असून शिवसेना आणि मनसेने वेगळा संसार थाटला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोघे एकत्र निवडणूक लढवत आहेत; मात्र खरी लढाई शिवसेना आणि भाजपमध्ये होणार आहे, असे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत भाजपचे नेते, वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेऊन त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे ही निवडणुकीमध्ये अधिक चुरस निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेची चर्चा
ऐरोलीत शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांना आव्हान देण्यासाठी भाजपने त्यांच्या प्रभागात देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करून वेगळे वातावरण निर्माण केले आहे. पनवेलमधील कळंबोली येथे भाजपने देवेंद्र फडणवीस यांची अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी घेतलेली मुलाखत अधिक चर्चेची ठरली. या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी पनवेलचा आगामी पाच वर्षांत होणारा कायापालट याबाबत विस्तृत माहिती दिली.
महाविकास आघाडी आणि कॉलनी फोरमच्या उमेदवारांनी मालमत्ता कराबाबत लेखी दिलेल्या शपथपत्रावर टीका करीत समाचार घेतला. फडणवीसांनी दोन्ही परिसरात घेतलेल्या सभा आणि मुलाखतींमुळे पनवेल आणि नवी मुंबईचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले.
पैसेवाटपाचे आरोप आणि व्हिडिओ
नवी मुंबईत काही ठिकाणी पैसेवाटप केल्याचे प्रकार घडले. एका गावात पैसेवाटप करण्यासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याला शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडल्याचा व्हिडिओ मनसेने प्रसिद्ध केला. या व्हिडिओमुळे मनसेने नवी मुंबईत पैसेवाटप करीत असल्याचा दावा केला आहे.
ठाण्याच्या सर्वांगीण विकासाचा वचननामा
ठाणे : शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महायुतीचा महत्त्वाकांक्षी वचननामा सोमवारी (ता. १२) जाहीर करण्यात आला. यामध्ये पायाभूत सुविधांपासून ते आरोग्य, शिक्षण आणि रोजगारापर्यंतच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ठाण्याची नवी ओळख ठरेल, असा २६० मीटर उंच व्ह्यूइंग टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ठाणे हे देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनवण्याचे लक्ष्य महायुतीने ठेवले आहे. पुढील १० वर्षांत सुमारे पाच लाख कुटुंबांना हक्काची पक्की घरे दिली जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

