शताब्दी रुग्णालयात औषधांचा तुटवडा?
शताब्दी रुग्णालयात औषधांचा तुटवडा?
ताप, मधुमेह, रक्तदाबाच्या औषधांसाठी रुग्णांची धावपळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी रुग्णालय) अत्यावश्यक औषधांचा साठा अपुरा पडत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दैनंदिन उपचारांसाठी आवश्यक असलेली औषधे उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र असले, तरी प्रत्यक्ष उपचार प्रक्रियेत वापरली जाणारी ताप, मधुमेह, रक्तदाब तसेच सामान्य अँटिबायोटिक औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रुग्णालयात न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरील मेडिकलचा आधार घ्यावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात ॲसिडिटी, रक्तदाबावरील औषधे तसेच काही महत्त्वाच्या अँटिबायोटिक्सचा साठा संपला आहे. मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसारख्या सिरपचीही कमतरता भासत असून, सेफामायसिनसारखी अँटिसेप्टिक औषधे तसेच किरकोळ जखमांवर वापरली जाणारी निओस्पोरिन उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याशिवाय मानसिक आजारांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रिसपेरिडोन या औषधाचाही साठा संपल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी औषधांच्या कमतरतेचे आरोप फेटाळले असले, तरी या विषयावर संबंधित विभागाशी चर्चा करून परिस्थिती तपासून पाहू, असे त्यांनी सांगितले.
=========
बाहेरील औषधांचा आधार
शताब्दी रुग्णालयावर कांदिवलीसह पश्चिम उपनगरांतीलच नव्हे, तर पालघरपर्यंतच्या भागातील रुग्णांचा मोठा भार आहे. कमी खर्चात उपचार मिळत असल्याने अनेक गरजू कुटुंबे या रुग्णालयावर अवलंबून आहेत; मात्र औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना खासगी मेडिकल स्टोअर्समधून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. मधुमेहाच्या उपचारांसाठी आलेल्या प्रवीण साठे (नाव बदललेले) यांनी सांगितले, की रुग्णालयात मोफत औषधे मिळतात म्हणून येथे येतो; मात्र सध्या बाहेरून औषधे घ्यावी लागत असल्याने खर्च वाढत आहे.
====
औषधांची सातत्यपूर्ण उपलब्धता महत्त्वाची : तज्ज्ञ
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग तसेच मानसिक आजार असलेल्या रुग्णांसाठी औषधांची सातत्यपूर्ण उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेवर औषधे न मिळाल्यास रुग्णांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड होऊ शकतो. त्यामुळे औषधसाठ्यावर नियमित लक्ष ठेवणे आणि साठा संपण्यापूर्वीच नव्या पुरवठ्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

