उल्हासनगरात निवडणूक नियोजनाचा फज्जा
उल्हासनगरात निवडणूक नियोजनाचा फज्जा
लांबच्या मतदान केंद्रांमुळे मतदारांची ‘पायपीट’
उल्हासनगर, ता. १५ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिका क्षेत्रात मतदान केंद्रांच्या चुकीच्या नियोजनाचा मोठा फटका मतदारांना बसत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक मतदान केंद्रे मुख्य रस्त्यापासून लांब आणि आडोशाला असल्याने मतदारांना ती शोधताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, खुद्द भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार राजेश वाधारिया यांनाही आपले नाव शोधण्यासाठी आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागल्याने प्रशासकीय ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे.
शहरात अनेक ठिकाणी नवीन मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत; मात्र या केंद्रांकडे जाणाऱ्या मार्गावर ना नावाचे फलक आहेत, ना दिशादर्शक. यामुळे नागरिक हवालदिल झाले असून तासनतास केंद्र शोधण्यातच त्यांचा वेळ जात आहे. यासंदर्भात राजेश वाधारिया यांनी संताप व्यक्त केला असून महापालिकेच्या निवडणूक विभागावर नियोजनाच्या अभावाचा गंभीर आरोप केला आहे.
नवीन केंद्रांच्या ठिकाणी साधे माहिती फलकही नसल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. अनेक मतदारांची नावे त्यांच्या घरापासून अत्यंत लांब असलेल्या केंद्रांवर आल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल झाले. केंद्रांच्या शोधार्थ होणाऱ्या त्रासामुळे अनेक मतदार मतदानाविनाच घरी परतण्याची भीती व्यक्त होत आहे.
निवडणूक विभागाच्या गलथान नियोजनामुळे सामान्य मतदारांना मनस्ताप होत आहे. जर या गोंधळामुळे मतदानाचा टक्का घसरला, तर त्याला सर्वस्वी निवडणूक यंत्रणाच जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वाधारिया यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

