

अर्धवट रस्त्यामुळे मृतदेहाची अवहेलना
जव्हार, ता. ७ (बातमीदार) ः आंबेपाडा येथील रहिवासी शैलेश वागदडा यांचा मंगळवारी (ता. ३) सायंकाळी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने चांभारशेत, तिलोंडा मुख्य रस्त्यावर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची विदारक स्थिती समोर आली आहे.
जव्हारपासून ४२ किलोमीटर अंतरावर तिलोंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे आंबेपाडा गाव आहे. या गावची लोकसंख्या १४० एवढी आहे. चांभारशेत येथील तिलोंडा मुख्य रस्त्यापासून आंबेपाड्यापर्यंत एक किलोमीटर ८०० मीटर लांबीचा नवीन रस्ता २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत माती-मुरूम व खडीकरण करून पूर्ण करण्यात आला आहे. यासाठी ४६ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. या रस्त्यावरून जीप, अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे; मात्र चांभारशेत ते आंबेपाडा हा रस्ता डांबरीकरणासाठी प्रस्तावित असतानाही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेअभावी मृतदेह झोळीमध्ये टाकून पायी आंबेपाडा गावात नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आल्याने संतापाची भावना आहे.