बंद भुयारी मार्गांमुळे नेरूळ एलपीत प्रवाशांची कसरत

बंद भुयारी मार्गांमुळे नेरूळ एलपीत प्रवाशांची कसरत
Published on

बंद भुयारी मार्गांमुळे नेरूळ एलपीत प्रवाशांची कसरत
अपघातांचा धोका वाढला
बेलापूर, ता. ७ (बातमीदार) : नेरूळ येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाजवळील सायन-पनवेल महामार्गावरील एलपी बसस्थानक हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. येथून एसटी, बेस्ट व खासगी बसेसची सतत ये-जा सुरू असते. प्रवासी व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही वर्षांपूर्वी येथे दोन्ही दिशांना चार भुयारी मार्ग बांधण्यात आले. मात्र, हे भुयारी मार्ग आजतागायत बंद असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.
दररोज शेकडो प्रवासी, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या मार्गाचा वापर करतात. भुयारी मार्ग बंद असल्याने महामार्ग ओलांडताना अपघातांचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, अस्वच्छता व गर्दुल्ल्यांचा मुक्काम यामुळे हे मार्ग वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत.

चौकट
प्रशासनाची टोलवाटोलवी
सदर भुयारी मार्ग सुरू कधी करणार याबाबत महानगरपालिका, सिडको प्रशासन यांना विचारले असता दोन्ही बाजूने ही जबाबदारी आमची नसल्याचा दावा करत टोलवाटोलवी करण्यात येत आहे. परिणामी, सामान्य नागरिकांचे यामुळे मोठे नुकसान होत असून, अपघातातदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर अनेकांना एलपी परिसरात जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.
देखभाल व सुरुवातीबाबत सिडको व महानगरपालिका एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप होत आहे.

कोट
“भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. देखभाल व सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. नागरिकांची गैरसोय होत असून, पाठपुरावा सुरूच राहील.”
– चंद्रकांत आगोंडे, नगरसेवक, शिवाजीनगर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com