दहावी, बारावीच्या परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित फेब्रुवारी, मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी मुंबई विभागीय मंडळाने कंबर कसली आहे. यंदाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत असून, प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहेत. मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सहा जिह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणारच आहे, पण त्यासोबतच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष दक्षता समित्या आणि भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत. तसेच परीक्षा केंद्रांवर कर्मचारी अदलाबदलीची प्रक्रियाही राबवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी नियमावली
मंडळाने गैरमार्ग रोखण्यासाठी काही स्पष्ट सूचना दिल्या आहेत: यात स्वतचे अधिकृत प्रवेशपत्र सोबत ठेवावे. परीक्षा कक्षात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने, गाईड्स किंवा कोणत्याही प्रकारच्या नोट्स नेण्यास सक्त मनाई आहे. उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक अंकात आणि अक्षरात अचूक लिहावा. अफवांवर विश्वास न ठेवता काही शंका असल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांशी किंवा अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा.
केवळ शिस्तच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीही मंडळाने पावले उचलली आहेत. केंद्रांवर पिण्याचे स्वच्छ पाणी, पुरेशी स्वच्छतागृहे आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सोय असणे बंधनकारक आहे. तसेच परीक्षा साहित्यासाठी सुरक्षित स्ट्राँग रूम असणे अनिवार्य केले आहे. वातावरण भयमुक्त आणि पारदर्शक असावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या कॉपीमुक्त अभियानास सहकार्य करावे.
- जोत्स्ना शिंदे, विभागीय सचिव, मुंबई विभागीय मंडळ

