द्वारली नांदिवलीत पाणीटंचाईचे सावट
द्वारली-नांदिवलीत पाण्यासाठी वणवण
''अमृत'' योजनेची टाकी असूनही रहिवासी तहानलेलेच
कल्याण, ता. १० (बातमीदार) : कल्याण पूर्व भागातील नांदिवली आणि द्वारली परिसरात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपये खर्चून अमृत योजनेची टाकी उभारूनही तांत्रिक दिरंगाईमुळे नागरिकांचे घसे कोरडेच असल्याने संताप व्यक्त होत आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यातून अमृत योजनेअंतर्गत या परिसरात दोन एमएलडी क्षमतेची भव्य पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे; मात्र ही टाकी अद्याप मुख्य जलवाहिनीला जोडलेली नाही. एमआयडीसीच्या माध्यमातून या टाकीला १० इंची पाइपलाइनची जोडणी दिल्यास, द्वारली आणि नांदिवली परिसरातील पाणीटंचाई कायमची संपुष्टात येऊ शकते. या गंभीर समस्येवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून तांत्रिक अडथळे दूर करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. नवीन जलवाहिनी मंजूर करून घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
नागरिकांचा इशारा
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या पाणीटंचाईमुळे महिलावर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. "प्रशासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. अमृत योजनेचे पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एमआयडीसीने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

