मुंबई पुणे एक्सप्रेस गॅस गळती . परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आरटीओ विभागाला कडक सूचना.
महामार्गावर गॅस टँकरला आता ४०ची वेगमर्यादा
मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
खालापूर, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गॅस टँकर अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. याची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. ११) खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि धनंजय गीध यांच्यासोबत बैठक घेतली.
या बैठकीला परिवहन अप्पर मुख्य सचिव, परिवहन आयुक्त, परिवहन उपसचिव, परिवहन सहायुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल, प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी खालापूर डॉ. विशाल नेऊन हेल्प फाउंडेशन सदस्य उपस्थित होते. गॅस टँकरसारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला सूचना केल्या आहेत. अशा धोकादायक वाहनांना घाटात वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रति तास ठेवावी. अवजड वाहनांनी असलेल्या ठरावीक लेनमधूनच प्रवास करावा, याकडे परिवहन विभागाने लक्ष द्यावे. तसेच नियम मोडणाऱ्या वाहनावर कारवाई करावी, असे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
प्रोपोलिन या अत्यंत ज्वलनशील गॅस वाहक टँकरचा ३ फेब्रुवारीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ अपघात होऊन गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत होण्यासाठी ३२ तासांपेक्षा अधिक काळ लागला होता. यादरम्यान पोलिस विभागाने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली. तसेच कोणतीही साधनसामग्री नसताना हेल्प फाउंडेशनच्या मदतीने गॅस गळती रोखण्यात यश आले होते. खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल जवळपास ३२ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी तळ ठोकून होते. अशा घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते.

