रिक्षा-टॅक्सीच्या नवीन परवान्यांना ब्रेक

रिक्षा-टॅक्सीच्या नवीन परवान्यांना ब्रेक
Published on

रिक्षा-टॅक्सीच्या नवीन परवान्यांना ब्रेक
ठाण्यात बेरोजगारांमध्ये संताप
रिक्षा-टॅक्सी परवाने बंद झाल्याने ठाण्यात बेरोजगारांचा संताप
ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) ः राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांच्या खुल्या धोरणावर तात्पुरती स्थगिती येताच त्याचे पडसाद ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात उमटायला सुरुवात झाली आहे. आरटीओ (प्रादेशिक परिवहन) कार्यालयाने नव्या परवान्यांचे काम थांबविले असून, पुढील आदेश येईपर्यंत नवीन रिक्षा-टॅक्सी परवान्यांसाठीची एलओआय प्रणालीही ‘इनॲक्टिव्ह’ करण्यात आली आहे. यामुळे रिक्षा चालवू पाहणाऱ्या बेरोजगारांमध्ये असंतोष आणि परवानाधारकांमध्ये आनंदाचे वातावरण अशी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील नोंदीनुसार सद्यःस्थितीत ठाणे परिवहन प्रादेशिक विभागात ७३ हजार ६७२ ऑटो रिक्षा परवाने अस्तित्वात आहेत; तर प्रवासी वाहतूक परवानाधारक टॅक्सीची अधिकृत संख्या ५०३ आहे. त्यातच रस्त्यावर अधिकृत रिक्षा, टॅक्सीसोबतच अनधिकृत वाहनेदेखील धावत आहेत. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत होताना दिसतो. वाढती स्पर्धा आणि रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामुळे अनेक संघटनांनी नवीन परवाने देण्यावर निर्बंध आणण्याची मागणी केली होती. त्या मागणीला परिवहन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर शासनाने रिक्षा-टॅक्सी परवान्याच्या खुल्या धोरणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत नवीन परवान्यांबाबत कोणतीही प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले. ठाणे परिसरातील रिक्षांची संख्या लक्षात घेता हा निर्णय रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियनचे अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी दिली.

रिक्षा-टॅक्सी परवाने खुले केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. सोबतच रिक्षा-टॅक्सी चालकांच्या धंद्यावरसुद्धा परिणाम होत होता. त्यामुळे युनियनकडून नवीन परवाने बंद करावेत, अशी मागणी परिवहनमंत्र्यांकडे केली होती.
- संतोष पंडागळे, अध्यक्ष, समता क्रांती सेना रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन

शिक्षण घेऊनसुद्धा काम मिळत नाही. त्यामुळे शिफ्टने रिक्षा चालवीत होतो. मालकाने रिक्षा परत घेतली आहे. स्वतःची रिक्षा असावी यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु आता तो मार्गदेखील बंद केला जात आहे. त्यामुळे पुन्हा परवाने सुरू करावेत अथवा शासनाने बेरोजगार भत्ता द्यावा.
- सागर येडे, बेरोजगार युवक, ठाणे

कोट फोटो : १) दाढीवाला - सागर येडे
२) संतोष पंडागळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com