एमआयडीसीच्या पाण्याच्या बिलावर अतिरिक्त अनामत रक्कम भरावी लागणार
डोंबिवलीत पाणी ग्राहकांना एमआयडीसीचा ‘शॉक’
बिलात अतिरिक्त अनामत रकमेचा बोजा
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील निवासी, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना यंदा पाण्याचे बिल पाहून मोठा धक्का बसला आहे. एमआयडीसीने पाणी बिलासोबत ‘अतिरिक्त अनामत रक्कम’ भरण्याचे आदेश दिले असून, यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महावितरणच्या धर्तीवर आता एमआयडीसीनेही संपूर्ण महाराष्ट्रात अतिरिक्त अनामत रक्कम घेण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीच्या नियमानुसार गेल्या १० महिन्यांच्या बिलाची सरासरी काढून तीन महिन्यांच्या बिलाइतकी रक्कम अनामत म्हणून ठेवली जाते. ग्राहकाने पूर्वी भरलेली अनामत रक्कम या तीन महिन्यांच्या सरासरीपेक्षा कमी असल्यास, उर्वरित रक्कम ‘अतिरिक्त अनामत’ म्हणून बिलात आकारली जात आहे. निवासी ग्राहकांना ५०० ते ९,४५० रुपयांपर्यंत, तर व्यापारी ग्राहकांना त्याहून अधिक रकमेचा भुर्दंड बसला आहे.
एकीकडे वर्षभरापूर्वीच पाणी दरात वाढ करण्यात आली असून सध्या निवासी दर ९.२५ रुपये, तर औद्योगिक दर २५.२५ रुपये प्रति क्युबिक मीटर आहे. त्यातच ड्रेनेज चार्जेस आणि त्यावर १८% जीएसटी लावला जात असल्याने ग्राहकांची बिले आधीच भरमसाट येत आहेत.
प्रामाणिक ग्राहकांना फटका
एकीकडे एमआयडीसीची १४ टक्के पाणी गळती होत आहे आणि अनेक ठिकाणी अनधिकृत जोडण्यांद्वारे पाण्याची चोरी होत आहे. अशा परिस्थितीत नियमित बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे आणि आता ही जाचक अनामत रक्कम लादली जात आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे. ही अनामत रक्कम भरण्याची मुदत २३ मार्चपर्यंत देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
क्षेत्र : निवासी, औद्योगिक आणि व्यापारी (अंदाजे १,८५० जोडण्या)
अनामत रक्कम : सरासरी तीन महिन्यांच्या बिलावर आधारित
मुदत : २३ मार्च २०२६पर्यंत

