

सुक्या मासळीला बाजारात भाव
ओल्या माशांच्या तुटवड्यामुळे मागणीत वाढ
कासा, ता. १५ (बातमीदार)ः हवामानातील बदल, समुद्रातील अनिश्चित परिस्थितीमुळे मच्छीमारांना अपेक्षित प्रमाणात मासेमारी होत नसल्याने ताज्या माशांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर खाडी परिसरात सुके मासे तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे.
सुक्या मासळीमध्ये बोंबील, मांदेली, करंदी, सुकट तसेच इतर लहान माशांचा समावेश आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात हा पारंपरिक व्यवसाय मानला जातो. मासे मुबलक प्रमाणात मिळाल्यास ते स्वच्छ करून उन्हात चार ते आठ दिवस वाळवले जातात. मोठ्या माशांचे तुकडे करून त्यांना मीठ लावून साठवले जाते, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. सध्या बोंबील, सोडे (कोळंबी) यांना बाजारात चांगली मागणी असून, चटणीसाठी वापरला जाणार जवळ्याला अधिक पसंती मिळत आहे. तसेच मांदेली, वाकडी हे मासे मोठ्या प्रमाणात वापरत असल्याने मोकळ्या जागांवर वाळवण्यासाठी टाकलेले दिसत आहेत.
-----------------------------
५०० ते ६०० रुपये किलोला विक्री
ताज्या माशांचा तुटवडा असल्याने सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात ३०० रुपये प्रतिकिलो भावाने खरेदी होणारी मासळी किरकोळ बाजारात ५०० ते ६०० रुपये प्रतिकिलो भावाने होते.
--------------------
समुद्रात मिळणारे लहान मासे उन्हात वाळवून त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह करत आहोत.
- दिप्ती मेहेर, मच्छीमार