

शासकीय कर्मचाऱ्यांचे संपामुळे नागरिकांचे हाल
पेण, ता. २१ (वार्ताहर) : सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे या प्रमुख मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २१) राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला जिल्ह्यामधूनही प्रतिसाद मिळत आहे. परंतु, या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले.
शासकीय महसूल खात्यासह बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी वाचनालय येथून नगरपालिका आणि त्यानंतर पेण तहसील कार्यालय असा मोर्चा काढला आणि मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. सरकार शासकीय कर्मचाऱ्यांबाबत संवेदनशील होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे तालुका सचिव विशाल साजेकर यांनी सांगितले. यावेळी तलाठी संघटना अध्यक्ष रुपेश म्हात्रे, सचिव अनिकेत पाटील, उपविभाग अध्यक्ष राकेश कळमकर आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.