

ठाणे, ता. ८ (बातमीदार) : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या ठाण्यातील व्हीपीएम संस्थेच्या ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे. स्रग्वी समीर बर्वे हिला सांस्कृतिक कला कोट्यातील गुणांसह १०० टक्के गुण प्राप्त झाले, तर अवनी रवींद्र पेंडसे हिने ९७.८० टक्के गुण मिळवले. तसेच स्रग्वी बर्वे, अंजली साठे, अवनीश पोटे, मनस्वी पालव, अवनी पेंडसे आणि शमिका कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष यश मिळवले. विद्यार्थ्यांचे प्रामाणिक परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.