हरित डोंबिवलीचा निर्धार

हरित डोंबिवलीचा निर्धार
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : शहरातील वाढत्या कचरा समस्येवर प्रभावी उपाययोजना राबविण्यासह पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील सुमारे ५० संस्थांनी स्थापन केलेल्या ‘नागरी अभिवादन न्यास’च्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. ‘स्वच्छ व हरीत माझ्या डोंबिवलीचा’ हा निर्धार व्यक्त करत शहराला इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.
उपायुक्त रामदास कोकरे यांनी पर्यावरण संरक्षणासंदर्भातील नव्या कायदेशीर तरतुदींची माहिती देताना, १ एप्रिलपासून लागू झालेल्या नियमांनुसार कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देत त्यांनी घनकचऱ्याचे वर्गीकरण, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. उपमहापौर राहुल दामले यांनी शहर स्वच्छतेत नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत वृक्षारोपण मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
समारोप करताना न्यासाचे उपाध्यक्ष माधव जोशी यांनी गेल्या काही वर्षांत शहर स्वच्छतेत झालेल्या सुधारणा अधोरेखित केल्या. मात्र, भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देण्यासाठी आताच ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘बनू इंदूर’ हा सामूहिक निर्धार व्यक्त करत कोकरे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
बैठकीला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले, उपायुक्त रामदास कोकरे, नगरसेविका खुशबू चौधरी, पद्मश्री गजानन माने यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरण कार्यकर्ते आणि सुमारे ७५ नागरिक उपस्थित होते.

कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती आवश्यक
आयुक्त अभिनव गोयल यांनी चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. डोंबिवली-कल्याण शहरात दररोज निर्माण होणारा सुमारे ७०० टन कचरा कमी करण्यासाठी घराघरांत कचरा वर्गीकरण आणि व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील ज्या सोसायट्या, चाळी आणि वस्त्यांमध्ये जनजागृतीची गरज आहे, त्या भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून इच्छुक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कचरानिर्मिती कमी करणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही आयुक्तांनी त्यांनी नमूद केले. या मोहिमेत महापालिकेला सहकार्य करण्यासाठी अनेक संस्थांनी तत्काळ तयारी दर्शविली.

वृक्षारोपणाचा आराखडा
शहरात आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा आराखडाही सादर करण्यात आला. चालू वर्षात सव्वा लाख झाडे लावण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले असून नागरिकांनीही स्वतःहून वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

संयोजकांचे संस्थांना आवाहन
बैठकीदरम्यान अनेक संस्थांनी जनजागृती मोहीम आणि वृक्षारोपण उपक्रमांसाठी शहरातील विविध विभागांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था आणि नागरिकांनी गणेश मंदिर येथे प्रवीण दुधे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com