आझाद मैदानात मातंग समाजाचा हुंकार!

आझाद मैदानात मातंग समाजाचा हुंकार!
Published on

मुंबई, ता. २४ : राज्यातील अनुसूचित जातींमध्ये असलेला मांग, मातंग हा समाजघटक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासात प्रचंड मागास राहिलेला आहे. या समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक आणि नोकऱ्यांत आरक्षणाचा वाटा मिळावा, यासाठी सरकारने तत्काळ राज्यात आरक्षण उपवर्गीकरणाचे सूत्र लागू करण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २४) आझाद मैदानात राज्यभरातील विविध मातंग संघटनांनी भरपावसात आंदोलन केले.

अण्णा भाऊ साठे क्रांती सेना या संघटनेच्या पुढाराकाराने आझाद मैदानात हे आंदोलन छेडण्यात आले. यात सरकारने तत्काळ अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करावा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा सरकारने सन्मान करून राज्यात निर्णय घ्यावा इत्यादी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या आंदोलनात प्रामुख्याने सचिन साठे, कुसुमताई गोपले, सावित्रीबाई साठे, लाल सेनेचे प्रमुख गणपत भिसे, एल. डी. कदम, गणेश भगत, टी. एन. कांबळे, आकाश तिवडे आदींनी आपल्या भाषणातून मांग समाजाला उपवर्गीकरणाची गरज का वाटते, यावर आपली भूमिका मांडली.

मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजासह अनेक वंचित घटकांना अपेक्षित प्रमाणात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि शासकीय सेवांमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. परिणामी आरक्षणाचा मूळ उदेश पूर्णपणे साध्य झालेला नसल्याचा दावाही या वेळी करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान भवनात भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निवेदन स्वीकारल्याची माहिती गणपत भिसे यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com